मुंबईत ‘मारेला डिस्कवरी’ जहाज पुन्हा युरोपात जाणार : गोव्यातील 66 खलाशांचा समावेश : खलाशी कुटुंबियांचा आक्रोश
प्रतिनिधी / पणजी
मुंबईत ‘मारेला डिस्कवरी’ या युरोपियन बोटवर अडकून पडलेल्या गोव्यातील 66 खलांशाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेला महिनाभर ही युरोपियन बोट मुंबईत आहे. या बोटीवरील खलाशाना उतरवून घेतले जात नसल्याने आता ही बोट आज बुधवारी परत युरोपला प्रयाण करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या बोटीवरील गोमंतकीय खलाशांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू झाला आहे.
ही बोट पुन्हा युरोपला गेल्यास हे खलाशी पुन्हा जीवंत येतील किंवा नाही याची खात्री नाही, असे त्यांचे कुटुंबीय आणि राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.
या खलाशांना कोरोनाची बाधा झालेली नाही. या खलाशांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधून स्थितीची कल्पना दिली आहे. त्याचबरोबर गोव्यातील काँग्रेस, भाजपसह अन्य राजकीय नेत्यांना संपर्क करून व व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पाठविले आहे. आम्हाला गोव्यात न्यावे, अशी मागणी ते करीत आहेत. मात्र सरकारने या खलाशांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
खलाशांसह बोट परत युरोपला नेण्याची तयारी
गेला महिनाभर ही बोट मुंबईत आहे. गोव्यात मुख्यमंत्री व अन्य नेत्यांशी संपर्क करण्यात आलेला आहे. सरकारला या खलाशांसंदर्भात पूर्ण कल्पना आहे. मात्र या बोटीवरून खलाशांना उतरविले जात नसल्याने आता ही बोट पुन्हा माघारी परतण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता या खलाशांचा गोंधळ उडाला आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांचा जीव टांगणीला लागला आहे. या खलाशांना गोव्यात आणावे यासाठी त्यांचे कुटुंबीय विनंती करीत आहेत. कित्येक राजकीय नेत्यांना त्यांनी विनंती केली. विरोधी पक्षनेत्यांसह अन्य आमदारांनीही सरकारला विनंती केली. मात्र त्यांना गोव्यात आणण्याबाबत ठोस निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश सुरू झाला आहे.
युरोपात कोरोनाचे थैमान सुरू आहे. ही बोट या खलाशांसह पुन्हा युरोपला गेल्यास काय होईल हे सांगता येत नाही. केवळ एक दिवसाचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे सरकारने काहीतरी करावे अशी मागणी होत आहे. या खलाशांच्या कुटुंबियांची सध्या धावाधाव सुरू आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी याबाबत संपर्क साधला आहे. त्यांनी प्रयत्न सुरू असून निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रतिमा कुतिन्हो यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली. अगोदर प्रतिमा कुतिन्हो यांना पोलिसांनी अडविले तर काही महिला काँग्रेस कार्यकर्त्यांना चर्च चौकाजवळ अडविले. त्यांना चालत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जावे लागले.
प्रतिमा कुतिन्हो यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
प्रतिमा कुतिन्हो यांनी भाजप नेते, मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यास सुरुवात करताच त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यास परवानगी देण्यात आली. तत्पुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनीही कुतिन्हो यांच्याशी फोनवर बोलणी केली. कुतिन्हो यांना पोलिसांनी अडविताच त्यांनी सरकार व भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. मुंबईत अडकलेल्या गोव्यातील बांधवांना गोव्यात आणण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटत आहे. हरिद्वार येथे अडकलेल्या गुजराती नागरिकांना खास बसगाडी पाठवून आणले जाते, मात्र महिनाभर अडकून पडलेल्या खलाशांना सरकार का आणत नाही, असा प्रश्न त्यांनी केला.