सोनभद्रमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी सोनभद्र येथील प्रचारसभेत समाजवादी पक्षावर निशाणा साधला आहे. कोरोनावरील लसीकरणाला विरोध करणारे काही जण आहेत. आमच्या सैन्याच्या पराक्रमावर हेच लोक प्रश्न उपस्थित करतात. उत्तरप्रदेशची जनता अशा लोकांना मतदान करू शकत नाही. भारताची लसीकरण मोहीम अत्यंत वेगाने सुरू आहे. 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्यात येत आहे. हा आकडा ऐकून जग चकित होत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
परिवारवाद्यांनी भारताचा अपमान करण्याचा विडा उचलला आहे. हा अपमान उत्तरप्रदेशचा अपमान आहे. येथील जनतेला काही राजकीय पक्षांनी विकासापासून दूर ठेवले. परिवारवादी पक्ष देश आणि जनतेचे कल्याण करू शकत नाहीत. सोनभद्रमधील खनिजसंपदा लुटून परिवारवाद्यांनी लोकांना वाऱयावर सोडले होते. परंतु भाजप सरकार सोनभद्र सारखे जिल्हे आणि आदिवासी समुदायाला विकासाच्या शर्यतीत मागे राहू देणार नसल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
लोकांना पक्के घर देण्याचा मोदींचा निर्धारही पक्का आहे. आम्ही सोनभद्रमध्ये हजारो घरे निर्माण केली आहेत. पक्के घर आणि नळाद्वारे जल पोहोचविण्याचे काम केले जातेय. तर परिवारवादी लोक शासकीय खजिन्यावर नजर ठेवून असून हे भ्रष्टाचारी मजबूत झाल्यास लोकांचा पैसा हडप करणार आहेत. भाजप सरकारने आदिवासी सेनानींना राष्ट्रीय ओळख मिळवून दिली आहे. बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यासह आदिवासी संग्रहालय स्थापन केले जात असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.