बोकारो / वृत्तसंस्था
जवळपास तीन दिवस कोळशाच्या खाणीत अडकलेल्या चार कामगारांची सुखरुप सुटका झाली आहे. सोमवारी सकाळी ते खाणीबाहेर पडले. त्यांनी अडकलेल्या जागेपासून आपला मार्ग बाहेरपर्यंत खणून काढला आणि स्वतःची सुटका करुन घेतली. तुटपुंजे अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव यांच्याशी झुंजत त्यांनी आपला जीव वाचविला. त्यांच्या निर्धाराचे कौतुक होत आहे.
लक्ष्मण राजवर, रावण राजवर, आनंदी सिंग आणि भरत सिंग अशी त्यांची नावे आहेत. खाणीत झिरपणारे पाणी पिऊन त्यांनी 3 दिवस तग धरला. ही घटना भारत कोकींग कोल लिमिटेडच्या एका बंद झालेल्या खाणीत घडली. ही खाण बंद झाल्यानंतर येथे बेकायदा खाणकाम काही लोकांनी सुरु केले होते.
या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यांना खाणीत शिरताना सुरक्षा साधनेही देण्यात आली नव्हती. झारखंडमध्ये अशा अनेक बेकायदा खाणी असून तेथे असे अपघात नेहमी होत असतात. त्यामुळे तेथील राज्य सरकारने अशा बेकायदा खाणींवर बंदी घालून कामगारांना धोक्यापासून वाचवावे, अशी मागणी होत आहे. कालीमातेच्या कृपेमुळेच आम्ही वाचलो, अशी भावना या वाचलेल्या कामगारांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.