खानापूर / प्रतिनिधी
नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आला तरी खानापूर तालुक्यात ढगाळ हवामान काय पिच्छा सोडायला तयार नाही. त्यातच काही दिवसात लोखंड आणि सिमेंटचे दर गगनाला भिडल्याने इमारतीची बांधकामे देखील कमी होऊ लागली आहेत. याचा विपरित परिणाम खानापूर तालुक्यातील वीट व्यवसायावरही झाला आहे.
वास्तविक दरवर्षी नोव्हेंबर महिना उजाडला की, तालुक्यात वीट उत्पादनाला सुरुवात होते. या आधी व्यवसायिक वीट उत्पादन सुरु करण्याची पूर्वतयारी करतात. काही वीट उत्पादक अन्य ठिकाणाहून माती आणून विटा तयार करतात. वीट उत्पादन सुरु करण्यापूर्वी मातीचा साठा केला जातो. तर ज्यांना पुरेशी जागा आहे ते व्यवसायिक जागेवरचीच माती खोदून वीट उत्पादन करतात. पण यावर्षी नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी अधूनमधून ढगाळ हवामान व पावसाच्या सरी सुरु असल्याने वीट उत्पादन करणाऱया जवळपास सर्व ठिकाणी पाणी साठून चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे अशा परिस्थितीत वीट उत्पादन सुरु करणे अवघड बनले आहे. यामुळे जवळपास वीट उत्पादनाचा एक महिना पूर्णपणे वाया गेला आहे. तर एकूण हवामान पाहता आणखी पंधरा-वीस दिवस तरी वीट उत्पादन सुरु करणे कठीण बनले आहे. त्यातच बरेच वीट उत्पादक किंवा वीट तयार करणारे मजूर शेतकरी आहेत. विटा सुरु करण्यापूर्वी आपली भात कापणी, मळणी व शेतीची इतर कामे पूर्ण करुन यानंतर विटा तयार करण्याच्या कामाला लागला. पण यावर्षी पावसाने भात उत्पादक शेतकऱयांचीही पूर्णतः वाट लावली आहे. यामुळे पावसात अडकलेले आपले भाताचे पीक सावरण्यातच शेतकऱयांचा वेळ जात आहे. याचा देखील वीट उत्पादनावर नकळत परिणाम होऊ शकतो.
यानंतर वीट उत्पादनासाठी अत्यंत कमी अवधी सापडणार असल्याने दरवर्षी पेक्षा वीट उत्पादनही कमी होण्याची दाट शक्यता आहे. त्यातच वीट उत्पादकांना विटा तयार करण्याच्या मजुराना सांभाळून ठेवणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी त्यांना आगाऊ रक्कम दिली जाते. पण वेळेत वीट उत्पादनास सुरुवात न झाल्यास ते वीट मजूर दुसरी वाट पकडतात. यामुळे आगाऊ रक्कम दिलेल्या वीट व्यवसायिकांचे नुकसान होते. एकूणच विचित्र हवामानामुळे तालुक्यातील वीट उत्पादकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यातच गेल्या दोनवर्षात कोरोनामुळे सर्वच बांधकामे बंद झाली होती. यामुळे तयार विटा जागेवरच पडून राहिल्याने वीट उत्पादकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. पण गेल्यावर्षी लॉकडाऊन काळातही बांधकाम व्यवसायाला काही प्रमाणात परवानगी देण्यात आली होती. साहजिकच यामुळे विटानाही गिऱहाईक होते. कोरोना काळ संपल्यावर तर पुन्हा एकदा बांधकाम व्यवसायालाही चांगले दिवस आल्याने विटानाही मागणी वाढली होती. पण गेल्या महिन्याभरात लोखंड आणि सिमेंटचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक बांधकाम व्यवसायिकांनी इमारतीची बांधकामे स्थगित ठेवल्याने विटांचीही मागणीही खुंटली आहे. साहजिकच याचाही परिणाम तालुक्यातील वीट उत्पादकांना सहन करावा लागत आहे. बऱयाच व्यवसायिकांची वीट उत्पादनाची जागा मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर आहे. पण ढगाळ हवामान आणि पावसामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची वाहने पोहचू शकत नाहीत, यामुळे एखाद्यावेळी गिऱहाईक असले तरी त्या ठिकाणी वाहनच पोहोचत नसल्याने गिऱहाईक असून वाया, अशी उत्पादकांची अवस्था झाली आहे.