खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात 51 ग्राम पंचायतींच्या 623 जागांसाठी 2215 इतके विक्रमी उमदेवारी अर्ज दाखल झाले. यानंतर झालेल्या अर्जांच्या छाननीत जवळपास 31 उमेदवारांचे अर्ज वेगवेगळय़ा कारणामुळे अवैध ठरवण्यात आल्यानंतर आता 2184 अर्ज शिल्लक राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवार दि. 14 डिसेंबर अखेरचा दिवस असल्याने दुपारी 3 नंतर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
खानापूर तालुक्यात विक्री अर्ज दाखल झाले तरी अर्ज स्वीकारतानाच निवडणूक अधिकाऱयानी एकप्रकारे त्या अर्जांची छाननी केली होती. यामुळे अर्ज नामंजूर होण्याची तशी अडचण नव्हती. केवळ आरक्षित जागेसाठी अर्ज भरलेल्यांनी संबंधित कागदपत्रे न जोडल्याच्या कारणावरुन असे काही अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर इदलहोंड ग्राम पंचायतीमधील अनुसूचित जमाती आरक्षित जागेसाठी एकही अर्ज न आल्याने ती जागा रिकामी राहिली आहे. विशेष म्हणजे यावेळी उमेदवारी अर्ज भरणाऱयांमध्ये तरुण वर्गाचा अधिक भरणा आहे. तर अनेक पदवीधर उमेदवारांचाही त्यामध्ये समावेश आहे. बरगाव ग्राम पंचायतीमधील कुप्पटगिरी गावातील सामान्य महिलेसाठी आलेल्या 5 अर्जांमध्ये पद्मश्री पाटील या चार्टर्ड अकौटंट पदवी संपादन केलेल्या महिलेचाही त्यामध्ये समावेश आहे. तालुक्यातील 51 ग्राम पंचायतींमध्ये सर्वात जास्त जागा इटगी ग्राम पंचायतीमध्ये असून त्या ठिकाणी 28 जागेसाठी 96 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ नंदगड ग्रा. पं. ला 23 जागा असून त्या ठिकाणी 104 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर त्यापाठोपाठची मोठी ग्रा. पं. असलेल्या गंदिगवाड ग्रा. पं. च्या 22 जागांसाठी 87 अर्ज दाखल झाले आहेत.
म. ए. समितीचे स्वतंत्र पॅनेल
आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ एकच दिवस बाकी असल्याने शनिवारी सायंकाळपासून रविवारचा पूर्ण दिवस अनेक गावांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होते. तर काही गावांमध्ये पॅनेलची जुळवाजुळव करण्यातही उमेदवारांचे पाठिराखे गुंतले होते. या निवडणुकीत थेट राजकीय पक्षांचा समावेश नसला तरी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे पॅनेल तयार केली आहेत. तर या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून ग्राम पंचायत निवडणुकीत आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत, यासाठी व्यूहरचना केली आहे. तर काँग्रेस पक्षाने देखील गाजावाजा न करता आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे पॅनेल तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण तालुक्यातील 51 ग्रा. पं. मध्ये अर्जांची संख्या मोठी असल्याने या निवडणुकीत बरीच चुरस निर्माण होणार आहे. अशाही परिस्थितीत कांही ग्राम पंचायतींमधील दोन-चार जागा बिनविरोध होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.