भाजपा-बजरंगदलाच्या कार्याचे सर्व थरातून कौतुक
प्रतिनिधी / खानापूर
खानापूर तालुक्यात सध्या कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटनाही घडत आहेत. पण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तिवर अंत्यसंस्कार करण्याची मोठी अडचण निर्माण झाली होती. यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. पण गेल्या काही दिवसात खानापूर तालुक्यातील भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व त्यांच्या सहकार्यांनी बेळगाव येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते सुनील कन्हेरी, प्रशांत धाकलुचे, रवी मिसाळे यांच्या मदतीने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 5 जणांवर त्यांनी अंत्यसंस्कार केले आहे. या उपक्रमाबाबत भाजप युवा नेते पंडित ओगले, त्यांचे सहकारी, बेळगाव येथील बजरंगदलाचे कार्यकर्ते यांचे कौतुक केले जात आहे.
शेडेगाळी (ता. खानापूर) व निंगापूर गल्ली तसेच बिडी, मुगळीहाळ खानापूर येथील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्ती वय अनुक्रमे 47, 68, 70 व 58 वर्षीय युवक आणि रुमेवाडी क्रॉस येथील 71 वर्षीय पुरुषावर बजरंग दल बेळगाव व खानापूर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी नियमानुसार अंत्यसंस्कार केले.
शेडेगाळीतील 47 वषीय सामाजिक कार्यकर्त्याचे बेळगाव येथील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले असता त्यांच्या कुटुंबीयांनी बेळगाव येथील बजरंग दल व खानापूर येथील भाजपा युवा नेते पंडित ओगले यांना संपर्क साधला असता बजरंग दलाचे कार्यकर्ते सुनील कन्हेरी, प्रशांत धाकलुचे, रवी मिसाळे यांनी आपली अँबुलन्स घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पंडित ओगले व भाजपा कार्यकर्ते राघवेंद्र गुरव, मारूती जाधव यांनी शेडेगाळी येथे पीपीई कीट घालून बेळगाव बजरंग दलाचे तीन कार्यकर्ते, खानापूर येथील भाजपाचे तीन अशा सहा जणांनी गावच्या वेशीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर निंगापूर गल्ली, लक्ष्मी मंदिर शेजारी कोरोनामुळे घरीच मृत्यू पावलेल्या 68 वषीय व्यक्तीवर खानापूर स्मशानभूमित अंत्यसंस्कार केले. बीडी येथील 70 वर्षीय व्यक्तीच्या घरच्या मंडळींनी अंत्यसंस्कारासाठी ओगले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपले सहकारी राज गावडे, मारुती जाधव, राघवेंद्र गुरव, किरण तुडवेकर यांना घेऊन बीडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मुगळीहाळ गावातील 58 वर्षीय व्यक्तीचे बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे निधन झाले. त्याचाही मृतदेह बेळगाव येथील बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी आणून मुगळीहाळ येथेच अंत्यसंस्कार पेंले. रुमेवाडी येथील एका 71 वर्षीय वृध्दाचेही खानापूरच्या सरकारी दवाखान्यात निधन झाले. त्या मृतदेहावरही रुमेवाडी येथे अंत्यसंस्कार केले.
कोरोना पॉझिटिव्हने मृत्यू पावलेल्या लोकांना हात लावायला नव्हे तर जवळ थांबायला सुध्दा लोक घाबरत आहेत. पण बेळगाव येथील बजरंग दल कार्यकर्ते सुनील कन्हेरी, प्रशांत धाकलुचे, रवी मिसाळे, खानापुरातील भाजपा युवा नेते पंडित ओगले, कार्यकर्ते राघवेंद्र गुरव, मारूती जाधव, यांनी धाडसाने केलेल्या कार्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.
मृत्यूवर नियंत्रण गरजेचे-पंडित ओगले यांचे आवाहन
खानापूर तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या घटना आता घडत असल्या तरी त्यावर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. असे असले तरी कोणीही दगावल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास आम्ही निश्चितपणे धाऊन जाऊ, पीपीई कीट घालून अंत्यविधी केल्यास कोणताही धोका नाही. यासाठी समाजातील युवकांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्यांना आमच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे. त्यांनी मोबाईल क्रमांक 7795149234 या क्रमांकाशी संपर्क साधावा. असे त्यांनी आवाहन केले आहे. केवळ अंत्यसंस्कारच नाही तर गरजू रुग्णांना सर्वप्रकारचे सहकार्य करणेही आता प्रशासनाबरोबरच समाजाचीही जबाबदारी आहे. प्रशासनाबरोबरच युवापीढीनेही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.