दोन दिवस देशव्यापी संप, आर्थिक व्यवहार झाले ठप्प : सरकारने खासगीकरणाचा विचार केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकार बँकांचे खासगीकरण करण्याचा विचार करीत आहे. त्यादिशेने सरकारची वाटचाल सुरू आहे. खासगीकरण झाल्यास कर्मचाऱयांना मोठा फटका बसणार असून याविरोधात बँक कर्मचाऱयांनी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. गुरुवारी संपाच्या पहिल्यादिवशी बँक कर्मचाऱयांनी कॅम्प येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. खासगीकरणाचा विरोध करत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले. बँक कर्मचारी आरपीडी चौकापासून गोवावेसपर्यंत रॅली काढून आपला निषेध व्यक्त करणार होते. परंतु बेळगावमध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱयांनी कॅम्प येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या. खासगीकरणासह कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱयांची नेमणूक केली जात असून त्याला विरोध करण्यात आला. बँकांचे विलीनीकरण होत असल्याने याचा फटका कर्मचाऱयांना बसत असून हे तात्काळ थांबविण्याची मागणी कर्मचाऱयांनी केली.
यावेळी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे जिल्हा समन्वयक एकनाथ गिंडे, फ्रान्सिस फर्नांडीस, मुरली करजगी, नारायण, विनोद, आर. एल. कुलकर्णी, संपदा हावळ, ए. व्ही. नाईक, दर्शन डेंगरे, सुधीर चिकोडी, सविता तुबची, धनश्री गोरगुंडी, ऐश्वर्या बोंगाळे, दीप्ती सिंग यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये आंदोलन करण्यात आले. बेळगाव परिसरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱयांनी या संपामध्ये सहभाग घेतला.
खासगीकरणाला कर्मचाऱयांचा विरोध
देशातील राष्ट्रीयीकृत बँका खासगीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू आहेत. अर्थमंत्र्यांकडून तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. याविरोधात देशभर कर्मचारी आवाज उठवत आहेत. खासगीकरणाला कर्मचाऱयांचा विरोध असून यामुळे ग्राहकांचेही नुकसान होणार आहे. सरकारने खासगीकरणाचा विचार केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा एकनाथ गिंडे यांनी दिला.
बेळगाव जिल्हय़ातील 4 हजार 500 कर्मचारी संपावर…
बँक कर्मचाऱयांनी देशव्यापी संप पुकारला असून त्यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील कर्मचाऱयांनी सहभाग घेतला आहे. गुरुवारी जिल्हय़ातील 125 हून अधिक राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बंद होत्या. 4 हजार 500 हून अधिक कर्मचारी संपावर होते. बँका बंद असल्याने जिल्हय़ातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले. जरी एटीएम सुरू असली तरी मोठे आर्थिक व्यवहार व चेकपेमेंट बंद असल्याने नागरिकांना फटका बसला.