- एम्सच्या संचालकांची डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल अशी माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली.
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, देशातील 100 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्याची गरज नाही. 50 ते 60 टक्के लोकांना वॅक्सिन दिल्यानंतर कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. तो वाढणार नाही.
पुढे ते म्हणाले, लसिकरण करण्याची दोन उद्दिष्ट आहेत. ज्या लोकांना कोरोनाचा जास्त धोका आहे, त्या लोकांना कोरोना लस देण्यात येणार आहेच. दुसरे म्हणजे, आम्हाला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचाय. जेणेकरून अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यास मदत होईल. त्यासाठी जर देशातील 50-60 टक्के लोकांना वॅक्सिन दिले तर व्हायरसचा संसर्ग रोखण्यास मदत होईल.
डॉ. गुलेरिया बोलताना म्हणाले की, वॅक्सिनचं ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्यात रेग्युलेटरी अप्रुव्हल मिळणे गरजेचे आहे. पुढिल दोन ते तीन महिन्यांत लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल. संपूर्ण देशात लस पोहोचवण्यात येईल. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला एक नाही, तर दोन ते तीन लस उपलब्ध होतील. जास्त वॅक्सिन असतील तर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.