राजू चव्हाण/ खेड
तालुक्यातील अलसुरे येथील 50 वर्षिय व्यक्तीचा कोरोनाच्या संसर्गाने झालेल्या मृत्यूनंतर गेल्या 20 दिवसांपासून कोरोनाशी शर्थीने मुकाबला करणारे येथील प्रशासन पुरते हादरले आहे. त्यातच मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्याने प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वेळोवेळी नागरिकांना सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणारे नागरिकही आता भयभीत झाले आहेत. याचमुळे कोणतेही कारण नसताना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सक्त सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून पुरेपूर दक्षता घेऊन कोरोनाच्या शिरकाव होऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. स्थानिक पातळीवरील सर्वच प्रशासकीय यंत्रणांनीही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्टा करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोआट प्रयत्न केला होता. मात्र तरीदेखील नागरिकांसह वाहनचालक व दुचाकीस्वार विनाकारण रस्त्यावर फिरून संचारबंदीचे उल्लंघन करत होते. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरणाऱयांना चाप लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने अखेर कठोर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली होती.
कोरोनाच्या भीतीने अनेकजण परदेशासह मुंबई, पुणे येथे परतले होते. प्रशासनाला याची माहिती मिळताच आरोग्य पथकामार्फत करण्यात प्राथमिक तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत होते. तालुक्यात होम क्वारंटाईनच्या संख्येने 300 टप्पाही पार केला होता. सौदी अरेबियातून परतलेल्या भोस्ते येथील एका व्यक्तीमध्ये कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येताच प्रशासनाची धाकधूक वाढली होती. त्याच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये निगराणीखाली ठेवण्यात आले होते.
मात्र त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला हायसे वाटले होते. त्यातील 5 जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न होताच प्रशासनाची डोकेदुखी आणखीनच वाढली होती. स्वाईन फ्ल्यूच्या शर्थीच्या उपचारानंतर सातहीजणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर स्थानिक प्रशासन सर्वच पातळय़ांवर प्रयत्नांची शिकस्त करत कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी अपार मेहनत घेत होते. पोलीस यंत्रणेने मुंबई, पुणेसारख्या ठिकाणांवरून रेल्वे टॅकसह पायी येणाऱया चाकरमान्यांना रोखत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
अलसुरे येथील व्यक्ती कोरोनाचा बळी ठरल्यानंतर गेल्या 20 दिवसांपासून कोरोनाशी शर्थीने मुकाबला करणारे प्रशासन पुरते हादरले आहे. त्यातच ही दगावलेली व्यक्ती 60 हून अधिकजणांच्या संपर्कात आल्याचेही समोर आल्याने प्रशासनाची चिंता आणखीनच वाढली आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी आतापर्यंत 37 जणांना आयसोलेशन करण्यात आले आहे. उर्वरितांचा शोध जारी असून त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हानही प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
या व्यक्तीच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासन पुन्हा अलर्ट झाले असून हादरलेल्या प्रशासनाने पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरूवात केली आहे. या व्यक्तीचा अलसुरेसह डाकबंगला परिसरातही वावर होता. याचमुळे खबरदारी म्हणून पाच गावांसह डाकबंगला परिसरात कन्टेनमेंट झोन जाहीर करून परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास अटकाव करण्यात आला आहे. बाजारपेठेतील व्यापाऱयांनीही पुढाकार घेत सलग चार दिवस अत्यावश्यक सेवांची दुकाने बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. यामुळे ‘त्या’ व्यक्तीच्या मृत्यूने तयार झालेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून पुन्हा शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.