खवटी-खालची धनगरवाडीत टँकरने पाणीपुरवठा सुरू ,आंबवली-भिंगारा टँकरच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी / खेड
तीनच दिवसांपूर्वी टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल करणाऱया तालुक्यातील खवटी-खालची धनगरवाडीत गुरूवारपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. गेल्या 2 वर्षांपासून खंडित झालेली पहिल्या टँकरची परंपरा यावर्षी मात्र पाण्याच्या भीषण दुर्भिक्ष्यामुळे पुन्हा सुरु होण्याची नामुष्की आली आहे. जिल्हय़ातील पहिला टँकर या ठिकाणी धावला आहे. आठ दिवसापूर्वी टँकरसाठी पहिला अर्ज दाखल करणाऱया आंबवली-भिंगारातील ग्रामस्थ मात्र टँकरच्या प्रतीक्षेतच आहेत.
उपलब्ध जलस्त्रोत पुरते आटल्याने पाण्यासाठी भटकंती करणाऱया खवटी-खालची व वरची धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी 27 मार्च रोजी प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता. या दोन्ही वाडय़ांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. अर्ज दाखल झाल्यानंतर प्रशासनानेही तातडीने सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाअंती खवटी-खालची धनगरवाडीतील जलस्त्रोत कोरडे पडल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार गुरूवारपासून प्रशासनाने खवटी-खालची धनगरवाडीत टँकरने पाणीपुरवठा सुरू केल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. खवटी-वरची धनगरवाडीसह आंबवली-भिंगारा येथील ग्रामस्थांना मात्र टँकरची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आंबवली-भिंगारा येथे आणखी काही दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. खवटी-वरची धनगरवाडीत मात्र लवकरच टँकर धावण्याची शक्यता आहे. गतवर्षी 27 मार्च रोजी तालुक्यातील पहिला टँकर चिंचवली-ढेबेवाडी व आंबवली-भिंगारा येथे धावला होता. खवटी-खालची व वरची धनगरवाडीत दरवर्षी पहिला टँकर सुरु करावा लागत असे. गेल्या दोन वर्षापासून ही परंपरा खंडित झाली होती. यावर्षी पाणीटंचाई काही अंशी लांबणीवर पडल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. खवटी-खालची धनगरवाडीत एका टँकरद्वारे गुरूवारपासून पाणीपुरवठा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यंत्रणा सतर्क झाली असून एका शासकीय टँकरची तातडीने उपलब्धतता केली आहे. पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पंचायत समिती सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे यांनी दिल्या आहेत.