निपाणीत आंबा विक्रीतून फसवणूक : सोशल डिस्टन्सिंगचेही उल्लंघन
प्रतिनिधी / निपाणी
निपाणी शहर व परिसरात गेल्या 15 दिवसात आंबा विक्रीतून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. असे असले तरी देवगड हापूसच्या नावाखाली धारवाड तसेच तुमकूर भागातून आलेला आंबा ग्राहकांच्या गळय़ात मारला जात आहे. ही फसवणूक लक्षात येऊनही केवळ स्वस्त आंबा म्हणून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.
24 मार्चपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु झाल्याने आंतरराज्य सीमाबंदी लागू झाली होती. त्यामुळे दरवर्षी मार्चमध्ये कोकणातील देवगड, रत्नागिरी या भागातून निपाणीत होणारी आंब्याची आवक थांबली होती. त्यामुळे यंदा आंबा खायला मिळणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र महिन्याभरानंतर निर्बंध काहीसे शिथिल झाल्याने देवगड भागातून आंब्याची आवक सुरु झाली. सुरुवातीला 450 ते 500 रुपये प्रतिडझन याप्रमाणे देवगड हापूस आंब्याची विक्री होत होती. आंतरराज्य वाहतुकीला बंदी असल्याने निपाणी भागात सध्या अनेकांवर बेरोजगारीची कुऱहाड कोसळली आहे. त्यामुळे पर्याय म्हणून शहर व ग्रामीण भागात युवावर्ग आंबा विक्री करताना पहायला मिळाला.
दर अधिक असतानाही ग्राहकांनी देवगड हापूस खरेदीला पसंती दिली. मात्र गेल्या पंधरा दिवसात कर्नाटकातील हुबळी, धारवाड, तुमकूर या भागातून आंब्याची आवक निपाणी भागात मोठय़ा प्रमाणात झाली आहे. तसेच स्थानिक भागातील आंबेही विकले जात आहेत. हे करत असताना पॅकींगसाठी वापरल्या जात असलेल्या खोक्यावर मात्र देवगड हापूस आंब्याचा उल्लेख आहे. तसेच ग्राहकांना आंबे विकतानाही हा देवगड हापूस असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारचा आंबा हा प्रतिडझन 100 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत विकला जात आहे.
शहर व ग्रामीण भागात आंबे विक्री वाढली आहे. गल्लोगल्ली आंबे विक्रेते आलेले दिसून येत आहेत. निपाणीत आंबा मार्केट परिसरात सौद्यासाठी दररोज पहाटे 5 ते 7 असे दोन तास परवानगी आहे. मात्र या दोन तासात आंबे तसेच अन्य भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गर्दीला आवर घालावा व नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.