लॉकडाऊनच्या काळात अफवा पसरविणार्यांना ‘सायबर’चा दणका, खोटय़ा बातम्या, अफवा पसरवू नका -मंत्री पाटील
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘महाराष्ट्र सायबर’ अशा गुन्हेगार व समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी व त्यांना पकडण्यासाठी सर्व आयुक्त व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करीत आहे. महाराष्ट्र सायबर यासाठी टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य सोशल मिडियावर चालणाऱया गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून असल्याची माहिती गृहराज्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
मंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये 17 एप्रिल 2020 पर्यंत एकूण 230 गुह्यांची (ज्यापैकी 8 अदखलपात्र आहेत) नोंद झाली आहे. त्यामध्ये बीड 27, पुणे ग्रामीण 17, मुंबई 16, कोल्हापूर 16, जळगाव 13, सांगली 10, नाशिक ग्रामीण 10, जालना 9, सातारा 8, नाशिक शहर 8, नांदेड 7, परभणी 7, , ठाणे शहर 6, नागपूर शहर 5, सिंधुदुर्ग 5 ,नवी मुंबई 5,सोलापूर ग्रामीण 5, लातूर 5, बुलढाणा 4, पुणे शहर 4, गोंदिया 4, सोलापूर शहर 3, रायगड 2, उस्मानाबाद 2, ठाणे ग्रामीण 1, धुळे 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व गुह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 106 गुन्हे दाखल झाल्याचे समोर आले आहे. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 75 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘टिकटॉक’ विडिओ शेअर प्रकरणी 4 गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 3 गुन्हे दाखल झाले आहेत. अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, युटय़ुब) गैरवापर केल्या प्रकरणी 40 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 46 आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी 31 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.
मंत्री पाटील म्हणाले, बीड शहरांतर्गत असणाऱया पेठ पोलीस स्टेशनमध्ये 18 एप्रिल रोजी आणखी एका गुह्याची नोंद करण्यात आली आहे .ज्यामुळे बीड जिह्यात नोंद झालेल्या सर्व गुह्यांची संख्या 27 वर गेली आहे. सदर गुह्यातील आरोपीने आपल्या सोशल मिडिया प्रोफाइलवर (फेसबुक, आदी) सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देऊन ,दोन धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकेल अशा आशयाच्या पोस्ट्स टाकल्या होत्या. नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱया जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये अजून एका गुह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर गुह्यातील आरोपीने ,कोरोनाबाधित व्यक्तींची संख्या, या विषाणूमुळे प्रादुर्भावित परिसर, याबाबत कोणतीही खातरजमा किंवा ऊपलब्ध सरकारी माहिती बरोबर न तपासता चुकीची माहिती, व्हाट्सअँप ग्रुपवरून पसरविली होती. ज्यामुळे सर्व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याचा संभव होता.
सध्या लॉकडाउनच्या काळात बऱयाच व्हाट्सअँप पोस्ट्स मधून अफवा ,चुकीची माहिती व खोटय़ा बातम्या पसरविल्या जात आहेत. अश्या फ़ॉरवर्ड मेसेजेसवर अंध विश्वास ठेवू नका .सर्व व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन्स ,ग्रुप निर्माते यांच्यावर विशेष जबाबदारी आहे की, या कोरोना महामारीच्या व संबंधित लॉकडाउनच्या काळात आपल्या व्हाट्सअँप ग्रुपवर कोणत्याही चुकीच्या बातम्या,खोटय़ा बातम्या किंवा माहिती, अफवा पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी. जर कोणी ग्रुप मेंबर तुम्ही सांगूनसुद्धा ऐकत नसेल तर सदर व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाका. ग्रुप काही काळाकरिता ‘only admins’ करा. एखादी खोटी बातमी किंवा चुकीची माहिती किंवा त्या प्रकारच्या पोस्ट्स असतील तर त्या विरुद्ध नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करा व सदर माहिती www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर (website) द्यावी. माझे नागरिकांना आवाहन आहे की कृपया कोणीही अफवा व खोटय़ा बातम्या whatsapp किंवा अन्य समाज माध्यमांवर (social media) पसरवू नयेत, व त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. केंद्र सरकार व राज्य सरकार वेळोवेळी ज्या नियमावली प्रसारित करत असतात, त्याचे पालन करावे व कृपया घरीच थांबावे असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले.