कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे प्रवक्ते संग्राम कांबळे यांचा संकल्प
सांगरुळ / प्रतिनिधी
चालू वर्षी होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शाहू विजयी गंगावेश तालीम कोल्हापूर च्या कोणत्याही मल्लाने जर “महाराष्ट्र केसरी” ‘किताब मिळवला तर त्याची हत्तीवरून मिरवणुक काढण्याचा अभिनव संकल्प गंगावेस तालमीचे माजी मल्ल, महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघाचे मुख्य प्रवक्ते तसेच महाराष्ट्र पोलीस दलाचे पै.संग्राम कांबळे यांनी केला आहे.
संपूर्ण भारत देशात कुस्ती पंढरी म्हणून ख्याती असलेल्या कोल्हापूरच्या शाहू विजयी गंगावेश तालमीच्या अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी किताबाच्या मानाच्या गदा पटकावल्या आहेत. पहिले डबल महाराष्ट्र केसरी पै.गणपतराव खेडकर हे गंगावेश तालमीचेच मल्ल आहेत .
काही वर्षांपासून गंगावेश तालमीचे मल्ल मैदानी कुस्तीत चमकदार कामगिरी करत आहेत, मात्र महाराष्ट्र केसरीच्या गदेने मात्र हुलकावणी दिली आहे.
आज पै माऊली जमदाडे, पै. सिकंदर शेख, पै.प्रकाश बनकर , पै.दत्ता नरळे यांच्यासारखे तडफदार मल्ल गंगावेश तालमी मध्ये सराव करत आहेत. गंगावेस तालमीचा सराव करणारे अनेक पैलवान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत इतर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात. यापैकी कोणीही जर महाराष्ट्र केसरी किताबाची मानाची गदा पटकावली तर कोल्हापूरच्या आजवरच्या परंपरेप्रमाणे त्यांची हत्तीवरून विजयी मिरवणूक कोल्हापूर शहरातून जल्लोषात काढणार असा संकल्प संग्राम कांबळे केला आहे.