राज्यात चैतन्यमयी वातावरण
प्रतिनिधी /पणजी
गोमंतकीयांचा सर्वात मोठा, जिव्हाळ्याचा, बालगोपाळांचा आनंदाचा सण असलेला गणेश चतुर्थी उत्सव राज्यात मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला आहे. घरोघरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले असून सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
घरोघरी गणराज स्थानापन्न झाले आहेत. राज्यात किमान दीड दिवस ते कमाल 21 दिवसांपर्यंत गणेश पूजनाची परंपरा आहे. त्याशिवाय सर्व शहरे तसेच ग्रामीण भागातही सार्वजनिक गणपती पूजण्यात येत आहेत. कोरोना महामारीमुळे गतवर्षी घरगुती गणेश पूजनाचा कालावधी कमी झाला. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवही परंपरेत खंड पडू नये यासाठी मर्यादित स्वरुपात पूजण्यात आले होते. कोरोनाच्या भीतीमुळे गतवर्षी श्रीमूर्तीच्या स्थापनेपासग्नून उत्तरपूजेपर्यंत सर्व देवकार्ये प्रत्येकाने एकतर स्वतःच किंवा ऑनलाईन वा विविध भटजींनी प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओंच्या आधार घेत केली होती.
कोरोनाची भीती यंदाही कायम असली तरीही गतवर्षीच्या तुलनेत तिचा प्रभाव किंचित कमी दिसून येत आहे. त्याचबरोबर सरकारनेही कोरोना निर्बंध बऱयाचअंशी शिथील केले आहेत. मार्गदर्शक तत्वांतही सूट दिली आहे. त्यामुळे भटजींना घरोघरी जाऊन पूजा करण्याची मोकळीक मिळाली आहे. असे असले तरी यंदाही घरगुती गणेशोत्सवाचा कालावधी कमीच राहणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवही मर्यादित स्वरुपातच पूजण्यात येणार आहेत.