ऑनलाईन टीम / उस्मानाबाद :
संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला.
मराठा आरक्षणासह समाजातील विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा ठोक मोर्चाची सुरुवात तुळजापुरातून करण्यात आली. या मोर्चात खासदार संभाजी राजे सहभागी झाले. त्यावेळी ते बोलत होते.
संभाजी राजे म्हणाले, आम्ही भीक नाही तर हक्क मागत आहोत. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. तसेच येत्या 15 तारखेला अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
- तलवार कुणा विरोधात उपसणार? : मंत्री विजय वडेट्टीवारांचा सवाल
संभाजी राजांच्या या वक्तव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजा रयतेचा असतो समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? ओबीसी विरोधात, दलित विरोधात? तलवारीची भाषा का? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत 200 जागा आहेत. त्यात 23 जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे (मराठा समाज) नुकसान व्हावे असे नाही. म्हणून राजांना सांगतो मध्य मार्ग काढता येतो. हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असेही वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटले.