वाकरेत सलग २५ वर्षे उपक्रम -ग्रामस्थांच्या, उपस्थितीत रौप्य महोत्सव उत्साहात संपन्न
वाकरे/प्रतिनिधी
“होळीला पुरणपोळीचा नैवेद्य” अर्पण करण्याऐवजी “गोरगरीबांच्या पोटातील होळीला पोळीचा नैवेद्य” दाखवण्याचा अभिनव उपक्रम वाकरे (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी सलग २५ व्या वर्षी कायम ठेवला. या उपक्रमाचा रौप्यमहोत्सव विद्युतरोषणाई आणि संगीताच्या तालात ग्रामस्थांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थांचा १०० % प्रतिसाद लाभला.
पूर्वीपासून वाकरे येथील ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिरासमोर सामुदायिक आणि सार्वजनिक होळी पेटवण्याची प्रथा आहे.त्यासाठी संपूर्ण गावातून गोवऱ्या जमा करून होळी पेटवली जाते.त्यानंतर संपूर्ण गावातील घराघरातील पुरणपोळ्या, भात,नारळ असा नैवेद्य होळीमध्ये अर्पण करण्याची परंपरा गावात होती. मात्र होळीत टाकल्या जाणाऱ्या नैवेद्यामुळे हजारो पोळ्या, भात आणि नारळांची नासाडी होते.म्हणून हा नैवेद्य गोरगरिबांना देण्यासाठी ग्रामस्थांचे परिवर्तन करण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा.एस.पी.चौगले यांनी २४ वर्षांपूर्वी घेतला. गेली सलग २५ वर्षे यशस्वीपणे हा उपक्रम चालू आहे. यावर्षीही गावातील नैवेद्याच्या हजारो पोळ्या पुरणपोळ्या,भात, नारळ एकत्र करून रात्रीच गोरगरिबांना वाटण्यात आला.
करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या हस्ते पुरणपोळी वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी भारतीय संस्कृतीत अन्नदान श्रेष्ठदान असल्याचे सांगून सलग २५ वर्षे हा उपक्रम सुरू असल्याबद्दल गौरवोद्गार काढले. समाजाने व सर्वच गावांनी वाकरे गावातील या उपक्रमाचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.