गौर गम हे एक प्रकारचे कृषी रसायन आहे. ते गवारी (क्लस्टर बीन) या भाजीपासून बनविलेले असते. गवारी कोवळी असताना ती तोडून भाजी म्हणून विकली जाते. निबर झाल्यावर त्याची मागणी कमी होते. आरोग्याच्या दृष्टीने गवारीची भाजी खूप उपयुक्त आहे. पचनप्रक्रिया त्यामुळे सुलभ होते. मधुमेही रुग्णांना ती उपयुक्त आहे. वजन संतुलित ठेवण्यास मदत करते. कॅल्शियम व फॉस्फरसचे अंश त्यामध्ये असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळते. कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यापासून बनविले जाणारे गौर गम हे औषधी आहे. विविध अन्नघटकांमध्ये त्याची आवश्यकता असते. विशेषतः आईस्क्रीम बनविताना त्यातील चिकटपणा घालविण्यासाठी गौर गम पावडरीचा वापर होतो. त्यामुळे आईस्क्रीम लुसलुसित व सुटे सुटे होते.
औषधी घटक म्हणूनदेखील गौर गम पावडरीचा वापर केला जातो. प्रिंटिंग प्रेसमध्ये शाई पातळ करण्याचे सामर्थ्य केवळ गौर गम पावडरीलाच असते. बॉलपेनमधली शाई पातळ होऊन ते सहज लिहिले जाते, ते गौर गममुळेच. प्रिंटिंग प्रेसमध्ये वापरले जाणारे अनेक रासायनिक पदार्थ आहेत, पण गौर गमची तुलना अन्य रसायनाशी होऊ शकत नाही. त्यामुळे गौर गमला खूप मागणी आहे. पेपर उद्योगामध्येदेखील गौर गमचा वापर होतो. खाण, शीतपेये, बेकरी, डेअरी, मटण प्रक्रिया, टेक्स्टाईलमध्ये त्यांचा खूप वापर होतो. विशेषतः ब्लिचिंग व डाईंगसाठी गौर गमचा वापर होतो. स्फोटके बनविण्यामध्ये त्याचा वापर होतो. सौंदर्य प्रसाधने बनविण्याच्या कामामध्ये गौर गम पावडरची गरज असते. ते पूर्णतः सेंद्रिय आणि जैविक असल्यामुळे त्याचे इतर रासायनिक घटकासारखे परिणाम जाणवत नाहीत. थिकनिंग एजंट म्हणून त्याचे कार्य खूप मोलाचे आहे. अनेक औषधी घटकांमध्ये गौर गमचा वापर होतो. म्हणून गवारी या भाजीच्या प्रकाराला महत्त्व आहे. भाजणीच्या अनेक प्रक्रियेमध्ये गौर गम पावडरीचा वापर होतो. त्यामुळे भाजण्याची प्रक्रिया समान व विस्तारित होते. घर्षण, झीज आणि औदासिन्य घालविण्यासाठी गौर गम पावडरीचा वापर केला जातो. अन्नघटक व इतर औद्योगिक घटकांमध्ये घनद्रव्य मऊ करण्यासाठी गौर गमचा वापर होतो. चाळण प्रक्रिया यामुळे सोपी होते. घनद्रव्याचे पातळ व समान विघटन करण्यासाठी गौर गम पावडरीचा खूप उपयोग होतो. अशा या बहुगुणी गौर गमसाठी गवारीची लागवड शेतकऱयांना खूप किफायतशीर आहे.
सर्व प्रकारच्या आणि सर्व हंगामांमध्ये गवारीची लागवड केली जाते. एकूण आठ राज्यांमध्ये याची लागवड होते. पण सर्वाधिक क्षेत्र आणि उत्पादन राजस्थानमध्ये होते. क्षारपीडित जमिनीमध्ये गवारीची लागवड होऊ शकते. गौर गम एचजी 365, एचजी 563, आरसीजी 1066 व 1003 या वाणांची लागवड केली जाते. यांची लागवड राजस्थान व गुजरातमध्ये होते. जुलै आणि मार्च हंगामामध्ये जास्त लागवड होते. साधारणतः दरएकरी 12 ते 15 क्विंटल उत्पादन निघते. सरासरी 2500 ते 3000 रु. क्विंटल असा दर मिळतो. एकरी 40 ते 45 हजार रु. निव्वळ उत्पन्न मिळते. सुमारे 80 ते 85 टक्के गवारीचे उत्पादन एकटय़ा राजस्थानमध्ये होते.
हरियाणा व गुजरात यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. राजस्थानच्या अल्वारा बाजारपेठेतील डिसेंबर 2020 मध्ये 100 किलो गवारीच्या बियांची किंमत रु. 8,200 होती. सध्या प्रतिकिलो सरासरी किंमत 160 ते 210 रु.च्या आसपास आहे. एनआयएएसच्या गौर इंडस्ट्री आऊटलुक-2015 च्या अहवालानुसार गौर गम उद्योगासाठी भविष्यकाळ खूप चांगला असल्याचे म्हटले आहे. अलीकडे राजस्थानच्या अनेक जिल्हय़ांमध्ये गवारीची लागवड केली जाते. शेतकऱयांच्या दारापुढे चारचाकी वाहन लागल्याचे दिसते. ते केवळ गौर गमला मिळालेल्या किमतीमुळे. काही वेळा एक क्विंटल बियाणाची किंमत दहा हजारावर गेलेली दिसते. भारतानंतर पाकिस्तान आणि अमेरिकेमध्ये गवारीची लागवड होते.
गौर गमसाठी गवारीच्या डाळीचा वापर होतो. छुरी हा दुसरा टप्पा तर कोरमा हा तिसरा टप्पा असतो. शेवटचे दोन्ही टप्पे जनावरांचे खाद्य म्हणून वापरले जाते. गवारीची डाळ गिरणीत दळून घेतल्यास जे पीठ मिळते त्यालाच गौर गम पावडर म्हटले जाते. दरवषी 5 ते 6 लाख टन डाळीचे उत्पादन होते. काही वेळा ते 8 ते 10 लाख टनापर्यंत जाते (2003-04). त्याचे क्षेत्र व उत्पादन वाढत असल्याचे दिसते. 1953 पासून गम तयार करण्याचे काम होते. हे तंत्र प्रथमतः अमेरिकेत तयार झाले. पण भारताचा जागतिक हिस्सा 80 टक्के आहे. 2013-14 मध्ये 23.5 लाख टन गवारीच्या बियाणाचे उत्पादन झाले होते. 2020-21 मध्ये त्याचे उत्पादन 25 लाख टनापर्यंत झाले होते. राजस्थानातील बिकानेर, बारमेर, जैसलमेर, धुरू जिल्हय़ांमध्ये अधिक उत्पादन होते. बाजार समित्या (मंडी) मध्ये हे उत्पादन विकले जाते. फास्ट हायडेटेड गमसाठी गवार बियांचा अधिक (80 टक्के) वापर होतो. अन्नघटकासाठी 20 टक्के तर औद्योगिक प्रक्रियेसाठी 10 टक्के गवारीच्या बिया वापरल्या जातात. या बियांवर प्रक्रिया करणारे 500 युनिट राजस्थानमध्ये आहेत. फास्ट हायडेटेड गमच्या तंत्रज्ञानामुळे अशा औद्योगिक संस्थांची संख्या 100 वरून 500 पर्यंत वाढली आहे. सबंध भारतामध्ये 100 युनिट्स आहेत. हे सर्व गम पावडर तयार करतात.
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गवारीच्या बिया मार्केटमध्ये येतात. डाळीच्या 50 किलोच्या बॅगा तयार केल्या जातात. त्यांची स्थानिक खरेदी होते. तसेच निर्यातदेखील होते. अपेडाकडून निर्यातीला प्रोत्साहन मिळते. पेपर बॅगेमध्ये 25 कि. पावडरीचे पॅकिंग केले जाते. कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये गवारीच्या बियाणाचा समावेश आहे. महाराष्ट्रासाठी गवारीचे उत्पादन फायदेशीर आहे. गवारीला भाजी म्हणून दर मिळाला नाही तरी तिची बियाणे घेता येतात. त्याची मार्केट मात्र राजस्थान, गुजरात आणि पंजाब राज्यात आहेत. अहमदाबाद, मेहसाणा, कच्छ ही महाराष्ट्राला जवळची बाजारपेठ आहे. दुष्काळी भागामध्ये संरक्षित सिंचन परिक्षेत्रामध्ये गवारीची लागवड करता येते. साधारण 90 ते 100 दिवसांत पीक निघते. राजस्थान गवारी 1038 ही महाराष्ट्रासाठी उपयुक्त वाण आहे. सीमांत व लघु शेतकऱयांना गवारीची लागवड एक वरदान आहे. उच्च गमचे अंश असलेल्या पाच वाणांची उपलब्धता आहे. महाराष्ट्र शासनाने काही प्रलोभने देणे उचित ठरेल. त्याची मूल्य साखळी निर्माण करून स्टार्टअप् योजनेमध्ये पावडर तयार करण्याच्या कामाला मदत होऊ शकते. हे कार्य इकोप्रेंडली आहे. डाळ बनविणे, फास्ट हैड्रेटेड गम, रिफाईंड गम अशा वेगवेगळय़ा प्रकारामध्ये उत्पादन करता येईल.
डॉ. वसंतराव जुगळे-9422040684