नागरिकांच्या बेपर्वाईमुळे कोरोना वाढण्याची शक्मयता अधिक : कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढतेय
मनीषा सुभेदार / बेळगाव
कुठे आहे कोरोना…. तो तर कधीच गेला…. आता काळजीचे कारणच नाही…. चला गर्दी करा… बसमध्ये गर्दी करा…. बाजारात गर्दी करा…. सण-समारंभांना गर्दी करा…. खरेदी करा… मास्क नको…. सामाजिक अंतर नको…. कोणत्याच नियमांचे पालन नको…. सध्या बहुतांशी बेळगावकरांनी कोरोना गेला आहे, असा समज करून घेऊन वरीलप्रमाणे वर्तन सुरू केले आहे. मास्कचे, सामाजिक अंतराचे गांभीर्य तर गेले आहेच. शिवाय कोरोनाचेही गांभीर्य लोकांना राहिले नाही. परिणामी अशा बेपर्वाईमुळे कोरोना वाढण्याची शक्मयता अधिक आहे, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवे.
जिल्हय़ात, राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळुहळू घटू लागली. शहरात एक-दोन कोरोना रुग्ण आढळून आले. मध्यंतरी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. माध्यमांनी जनतेला दिलासा मिळावा म्हणून आणि नियमानुसार माहिती देणे आवश्यक असल्याने वृत्त प्रसिद्ध केले. परंतु जनतेने मात्र कोरोना गेलाच असे समजून सर्व नियमांचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानली.
परिणामी आज बाजारपेठेत, दुकानांत, मॉलमध्ये, बसमध्ये, बसस्थानकांवर, कार्यालयांमध्ये, लग्न व समारंभामध्ये गर्दी हळुहळू वाढू लागली आहे. दुर्दैवाने प्रशासन, माध्यमे आणि आरोग्य संस्था मास्क वापरा, अंतर पाळा असा कंठशोष करत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणेच नागरिकांना श्रेयस्कर वाटू लागले आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली. बससेवा सुरू झाल्या आणि गर्दी वाढत चालली. परंतु मास्क वापरण्याबाबत विद्यार्थी पूर्णतः बेफीकीर आहेत. बसमध्ये ना वाहक, ना चालक, ना प्रवासी कोणीही मास्क वापरत नाही. जे मास्क वापरतात, ज्यांना कोरोनाचे गांभीर्य माहिती आहे त्यांनी सहप्रवाशांना काही सांगितल्यास त्यांची टर उडविली जाते.
महानगरपालिकेची मास्क न वापरण्याविरुद्धची कारवाई थंडावली आहे. प्रत्येक जण दुसऱयाने मास्क वापरावा, आपल्याला त्याची गरज नाही, अशा थाटात वावरतो आहे. परंतु स्वतःसाठी नाही तर दुसऱयांच्या आरोग्याची हेळसांड होणार नाही, याची जबाबदारी सुजाण म्हणवणाऱया सर्वांनी घ्यायची कधी? हा प्रश्न आहे. मार्च जवळ येऊन ठेपला आहे. त्या पाठोपाठ एप्रिल येईल आणि बेळगावमधील कोरोनाच्या शिरकावाला वर्ष पूर्ण होईल. निदान वर्षभर तरी काळजी घेण्याचे भान आपण ठेवणार आहोत
का?
3 एप्रिल 2020 रोजी कॅम्प, बेळगुंदी, हिरेबागेवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. 15 एप्रिल रोजी बेळगाव रेडझोन म्हणून जाहीर झाले. वास्तविक बेळगावमध्ये कोरोनाचा शिरकाव खूप उशिरा झाला. तोपर्यंत बेळगाव सुदैवी ठरणार का? अशा आशयाच्या चर्चा समाज माध्यमांवर सुरू होत्या. परंतु बेळगाव अपवाद ठरले नाही. 10 मे रोजी शहरात कोरोनाचे 100 रुग्ण आढळले. ऑगस्टमध्ये प्रतिदिनी कोरोना बाधितांची संख्या 450 ते 500 होती. 1 जुलै रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला. शहराने लॉकडाऊन अनुभवले.
नियमांचे पालन प्रत्येकाचे कर्तव्य
आता कुठे परिस्थिती हळुहळू नियंत्रणात येत आहे. रुग्णसंख्या घटत आहे. परंतु नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोना पूर्णतः हद्दपार झालेला नाही. उलटपक्षी त्याने पुन्हा हळुहळू डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा जागृती मोहीम हाती घेणे, महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारणे महत्त्वाचे ठरणार आहे. लॉकडाऊन काळात उद्भवलेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मास्क वापरणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.