There can be no transforming of darkness into light and of apthy into movement without emotion. अंधाराकडून प्रकाशाकडे आणि उदासीकडून उत्साहाकडे नेणारा बदल भावनेशिवाय संभवत नाही.
मनोविश्लेषक कार्ल युंग यांचे हे वाक्मय भावनेचे महत्त्व विशद करणारे आहे. आपल्या जीवनातील भावनांचे महत्त्व आपण अनेक लेखांमध्ये पाहिले. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे सुखद असो वा असुखद कोणतीही भावना विरुप पातळीवर गेली तर मानसिक आरोग्य आणि पर्यायाने शारीरिक आरोग्य धोक्मयात येते. एकंदर भावना असेल वा विचार, दोन्ही गोष्टींचा अतिरेक जीवनाची लय बिघडवून टाकतो. दैनंदिन कामामध्ये अडथळा येऊ लागतो आणि अनेक प्रश्न, समस्या उद्भवू लागतात. स्वयंपाक घरात गॅसजवळ आपण अगदी सज्ज उभे असतो आणि नजरेसमोर दूध उतु जाते, कुकरच्या शिट्टय़ांवर शिट्टय़ा होतात तरी गॅस बंद केला जात नाही. सतत चाललेले ‘विचारांचे रवंथ’ मन अस्वस्थ करते. विचारांचा काथ्याकूट होतो आणि उद्दीष्टांची जाणीव रहात नाही. नेमकी समस्या काय आहे याचा शोध घेणे न जमल्याने पर्यायही सापडत नाही. विचार आणि भावनांचा गुंता होऊन मूळ समस्या बाजूलाच राहते आणि शरीर मन दमल्यासारखे होऊ लागते.
खरंतर भविष्यात उपयोगी पडावे म्हणून आपला मेंदू सगळय़ा गोष्टींची नोंद ठेवत असतो. परंतु काही घटना, प्रसंग दु:खद असतील, ताण निर्माण करणारे असतील आणि त्याविषयीचे विचार, भावना आपण प्रयत्नपूर्वक बाजूला केल्या नाहीत तर मात्र तो कचरा मनाच्या एका कोपऱयात साठत जातो आणि एक दिवस उग्र समस्येचे रूप धारण करतो.
पहा, रोज आपण शरीराची काळजी घेतो. रोज स्नान करतो, नीटनेटके राहतो. अगदी गाडी असेल तर तिची काळजी घेतो. गाडे दीर्घ काळपर्यंत चांगली रहावी, यासाठी वेळच्या वेळी गाडीचे सव्हिrिसंग करतो. परंतु मनाच्या, विचारांच्या, भावनांच्या बाबतीत आपण खरंच सजग असतो का? कधीतरी आपल्या मनात काय चालले आहे हे दहा मिनिटे शांत बसून उत्सुकतेने न्याहाळतो का? खरंतर प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
आपल्या जीवनाची गाडी यशाच्या दिशेने धावायला हवी असेल तर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्यही उत्तम राखणे गरजेचे आहे. अनावश्यक विचार टाळण्यासाठी त्याकडे लक्ष असणे आवश्यक आहे. कारण सातत्याने विचारांची गर्दी होऊ लागली तर गडबड होऊ लागते.
उदाहरण देऊन सांगायचे तर, कॉम्प्युटरवर काम करत असताना मध्येच एखादी अनावश्यक विंडो पॉपअप होते आपण एकतर ती मिनीमाईज करतो किंवा नको असेल तर क्लोज करतो आणि परत कामाला सुरुवात करतो. आपला मेंदू हा तर सुपर कॉम्प्युटर आहे. अधेमधे त्याने साठवलेल्या फाईल्स ओपन होत असतात आणि ते नैसर्गिक आहे. परंतु त्या जर लक्षपूर्वक क्लोज केल्या नाहीत तर मात्र गोंधळ उडतो. आपल्या अँड्राईडवर वा कॉम्प्युटरवर सगळय़ा फाईल्स एकदम ओपन झाल्या तर काय होईल? तो हँग होईल. मोबाईलमधून अनावश्यक डेटा काढून टाकला नाही तर तो स्लो होईल. तसेच विचारांच्या अनेक फाईल्स ओपन झाल्या तर आपलीही अवस्था हँग झाल्यासारखीच होते. लक्ष देण्याची क्षमता, भावनांची हाताळणी यावर परिणाम होतो. खरंतर आपला मेंदू हा एक चमत्कारच आहे. जसा गाडीला ब्रेक असतो तसा मनाचा ब्रेक मेंदूत असतो. थांबवण्याची क्रिया मेंदू करत असतो. मेंदूचे ते महत्त्वाचे कार्यच आहे. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळीवर ही क्रिया घडत असते. उदा. एखाद्याने आपला अपमान केला. आपल्याला खूप राग आला. त्याला एक सणसणीत थप्पड मारावी असा विचार मनात आला परंतु तरीही आपण तशी कृती करण्यापासून स्वतःला थांबवतो. म्हणजेच कृती करण्यापासून आपण स्वतःला थांबवू शकतो. तसेच एखादे काम करत असताना झालेला अपमान आपल्याला आठवतो. काही क्षण आपण विचलित होतोही परंतु समोर असलेले काम महत्त्वाचे आहे याची जाणीव असल्याने आपण तो विचार प्रयत्नपूर्वक झटकतो आणि कामावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजेच शारीरिक वा मानसिक पातळीवर थांबणे वा थांबवणे ही क्रिया घडत असते. म्हणजेच अप्रासंगिक विचारांना, कृतींना थांबवायचे काम आपला मेंदू करत असतो परंतु असे असूनही विचार, भावनांचे काहूर का बरं उठते? आवेगात अनेक गोष्टी का घडतात?
आपल्या मनातील चिंता, दु:ख, राग इ. भावना आपल्या मेंदूतील लिंबिक सिस्टममधील संबंधित मज्जापेशींच्या उत्तेजित अवस्थेमुळे व ‘ऑटोनॉमिक’ मज्जासंस्थेच्या उद्दीपनाने तयार होत असतात. या भावनांच्या उद्भवास मेंदूतील विशिष्ट रसायने जशी कारणीभूत असतात तशी अतार्किक, अविवेकी विचारपद्धतीसुद्धा कारणीभूत असते.
मेंदूमधील अमाय्गडला (amygdala) हा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. परिणामी भावनांची निर्मिती होत असते. परंतु निर्माण होणाऱया विचार, भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम वैचारिक मेंदू करत असतो. म्हणजेच ज्यावेळी भावनिक मेंदू सक्रिय असतो तेव्हा वैचारिक मेंदूही सक्रिय असतो परंतु वैचारिक मेंदूची सक्रियता पुरेशी नसेल तर भावनिक मेंदू वैचारिक मेंदूला हायजॅक करतो आणि मग भान न राहणे, विचारांच्या वा भावनेच्या आवेगात कृती घडणे या गोष्टी घडू लागतात. हे टाळायचे असेल तर आपल्या मनातील विचार, भावना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी माईंडफुलनेसच्या तंत्राचा उपयोग होतो.
माईंडफुल असणे म्हणजे सजग असणे. माईंडफुलनेसचे तंत्र आपल्याला वर्तमानामध्ये रहायला मदत करतात, विचार आणि भावनांची सजगता निर्माण होते. त्यामुळे स्वीकाराचा परिघ विस्तारतो, वास्तवाचे भान येते. भूतकाळात अती रमणे वा भविष्याचा सतत विचार आणि त्यातून उद्भवणारी चिंता या गोष्टींमुळे निर्माण होणाऱया समस्या आपण टाळू शकतो. विचार भावना उत्सुकतेने न्याहाळणे, त्या स्वीकारणे आणि साक्षीभावाने त्याकडे पाहणे जमू लागते.
आपण माणूस आहोत म्हटल्यानंतर प्राण्यांसारखे सतत क्षणस्थ राहणे आपल्याला जमणार नाही. ते अपेक्षितही नाही. प्राणी क्षणस्थ राहू शकतात. उदा. एखाद्या कुत्र्याला आपण चार भाकऱया खायला घातल्या, भूक असेल तर तो एकाचवेळी चारही भाकऱया फस्त करेल. संध्याकाळसाठी एखादी राखून ठेवूया हा विचार त्याच्या मनात येणार नाही कारण असा विचार करायला त्याचा मेंदू तेवढा विकसित नाही. परंतु मानवी मेंदूचे विचार हे एक महत्त्वाचे कार्य आहे. ते झालेच नसते तर आपण प्रगती करू शकलो नसतो. आपल्याला भूतकाळातील आठवणी, भविष्याची काळजी ही असणारच आहे आणि ती असायलाही हवी परंतु भूतकाळातील सततच्या आठवणी मात्र गोंधळ उडवतील. आपण सारखेच ‘पास्टबुक’ चाळत राहिलो तर अनुभवातून शहाणपण येण्यापेक्षा ‘पास्टबुकचे बॅगेज’ जीवनाची वाटचाल अवघड करेल किंवा सततचे ‘फ्यूचर’चे विचार चिंतेत बदलले तर वर्तमानाचे मिळालेले ‘प्रेझेंट’ काळजीच्या काजळीने काळवंडून जाईल त्यामुळे निकोप मानसिक आरोग्यासाठी या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
माईंडफुलनेस ही कोणती कृती नसून ती मनाची स्थिती आहे. विचार, भावना यावर नियंत्रण ठेवण्याचे जे आपल्या मेंदूचे अर्थात प्री प्रंटल कॉरटेक्सचे काम आहे ते म्हणजे मनाचा मेंदूतील ब्रेक हे इनबिल्ट फंक्शन आहे. परंतु ते योग्य रीतीने
ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याला टप्प्याटप्प्याने टेनिंग देणे गरजेचे आहे. हे टेनिंग म्हणजेच माईंडफुलनेस किंवा सजगता…. याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात.
Ad. सुमेधा देसाई, मो.94226 11583