विजयवाडा / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून सर्व जुन्या मंत्र्यांना काढून नव्यांना संधी देण्यात आली आहे. याच परिवर्तन प्रयोगाची पुनरावृत्ती आंध्र प्रदेशात होण्याची शक्यता आहे. त्या राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी आपल्या सर्व विद्यामान मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱयांना स्थान देण्याच्या विचारात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
हे संकेत या राज्याचे ऊर्जा मंत्री बालिनेनी श्रीनिवास रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. राज्य मंत्रिमंडळाची व्यापक पुनर्रचना केली जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते. मुख्यमंत्री रेड्डी यांच्या मनात काय आहे, याची झलक त्यांनी दाखविली होती. सर्व मंत्र्यांना बदलून नव्यांना संधी देण्यात येईल, ही शक्यता त्यामुळे व्यक्त होत आहे. मात्र, अद्याप तसे अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. सध्याच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ व्यक्तींना पक्षकार्यासाठी घेऊन प्रशासनाचे उत्तरदायित्व नव्यांच्या हाती सोपवावयाची ही योजना आहे.