वार्ताहर / कोकरुड
गुढे पाचगणी पठारावर दि.03 रोजी अचानक लागलेल्या आगीत गुढे-पाचगणी पठारासह शेजारील गावातील पंधरा हजार एकरपेक्षा जास्त क्षेत्र जळून खाक झाले असून यामध्ये झाडे-झुडपे, गवत चाऱ्या सह शेकडो सरपटणारे
गुढे, पाचगणी,मानेवाडी,बांबरवाडी या पठारावरील पाचगणी येथील गवत पठारास मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. डोंगर-पठारावर वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग तीन किलोमीटर परिसरातील पाचगणी सह, मानेवाडी, गुढे, बांबरवाडी,पणूब्रे, ढाणकेवाडी, चरण, येळापुर,शिरसटवाडी, खटींगवाडी, माळवाडी, सावंतवाडी, रांजणवाडी, बेंगडेवाडी,मेणी, आटूगडे वाडी तसेच कराड तालुक्यातील लोहारवाडी, भरेवाडी, भुरभुशी, येळगाव परिसरातील पंधरा हजार एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील गवत चारा, झाडे-झुडपे जळून खाक झाली आहेत.
त्याचबरोबर या ठिकाणी असलेले सर्व प्रकारचे सरपटणारे प्राणी होरपळून गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी अजून गवत काढणी केली. नव्हती तर काहींनी गवत कापून डोंगरातच गवताच्या गंज्या रचून ठेवल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी फळबाग लागवड तसेच नव्याने झाडे लावली होती. तीही जळून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाचगणी, शिरसटवाडी,सावंतवाडी, बेंगडेवाडी सह परीसरातील मोठ्या संख्याने आलेल्या युवकांनी हातातील ओल्या ढाळ्याने आग विजवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच काळजी घेतल्याने या कार्यालया मार्फत उभारण्यात आलेल्या ५० एकरातील मोठमोठी झाडे-झुडपे वाचल्याने मोठे नुकसान टळले.
दरवर्षी पश्चिम भागातील डोंगर पेटलेले असतात. ते पेटतात की पेटवले जातात याचा अद्याप तपास लागला नसला तरी काही जण पुढच्या चांगल्या गवताची वाढ होण्यासाठी मुद्दाम पेटवत असल्याची चर्चा आहे. मात्र हजारो एकर पठार, डोंगर, दऱ्या जळून गेल्याने झाडे-झुडपा सह लहान-मोठे जीव जंतू जळून खाक होत आहेत.मंगळवारी लागलेली आग अद्यापही सुरूच असल्याचे दिसून येत आहे.