राज्यातील शेतकरी चिंतेत : तात्काळ लसिकरण सुरु करावे
प्रतिनिधी / फोंडा
राज्यातील गुरांना ‘फूट ऍण्ड माऊथ’ डिसिझ म्हणजेच लाळय़ा खुरकूत या संसर्गजन्य रोगाची लागण सुरु झाल्याने शेतकऱयांनी चिंता व्यक्त केली आहे. सांगे भागातील काही गुरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आली आहेत. पशुसंवर्धन खात्याने वेळीच रोग प्रतिबंधक लसीकरण सुरु न केल्यास हा विषाणूजन्य रोग फैलावण्याची भिती शेतकऱयांकडून व्यक्त केली जात आहे.
लाळय़ा खूरकूत हा विषाणूजन्य रोग गुरांच्या तेंड व पायाना होतो. कोकणीत या रोगाला ‘लाग’ असे म्हणतात. हा रोग प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संसर्गातून होतो. गुरांवर विषाणुंचा प्रादुर्भाव झाल्यास साधारण 4 ते 6 दिवसांत गुरांचे चारा खाणे व रवंथ करणे बंद होते. दुभत्या जनांवराच्या दुधावरही त्याचा परिणाम होतो. गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष व दूध उत्पादक अनुप देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार पशुसंवर्धन खात्याने या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी अद्याप कुठलीच खबरदारी घेतलेली दिसत नाही. दरवर्षी पावसाळा संपण्यापूर्वी लसीकरणाला सुरुवात केली जाते. यंदा ते झालेले नाही. राज्यातील शेतकऱयांच्या तांत्रिक शेतकरी या व्हॉटस्ऍप ग्रुपवर सध्या या रोगाविषयी शेतकऱयांनी जागृती व भिती व्यक्ती केली आहे. बाजारात या रोगावरील प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने ती कुठून आणायची हा प्रश्न काही शेतकऱयांनी उपस्थित केला आहे. लाळय़ा खूरकूत या रोगाची लागण तोंड व पायांना होत असल्याने गुरांच्या आरोग्यावर त्याचा लगेच परिणाम होतो. सुरुवातीला त्यांचे खाणे बंद होते व वेळीच त्यावर प्रतिबंधक लस न मिळाल्यास गुरे दगावण्याचा धोका असतो. पाळीव गुरांबरोबरच रस्त्यावरील भटक्या गुरांमध्येही हा रोग फैलावण्याची शक्यता शेतकऱयांनी व्यक्त केली आहे.