ओसरत्या गुलाब वादळाच्या समुद्रांतर्गत प्रवाहामुळे योगेश्वर संघाची रापणीचे नुकसान, सुमारे 70 जाळ्याचे साडेचार लाखाचे नुकसान
वेंगुर्ले/प्रतिनिधी
वेंगुर्ले नवाबाग किनाऱ्यावरील वेंगुर्ले बंदर नजिक लावण्यात येणाऱ्या रापण मच्छीमारीतील योगेश्वर या रापण संघाची रापण गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास लावत असताना ओसरत्या गुलाब वादळाच्या समुद्रांतर्गत पाण्याच्या प्रखर प्रवाहामुळे रापण वहात समुद्रात जाऊन सुमारे 100 मीटर खडकावरील भागात जाऊन पडली. यामुळे झालेल्या नुकसान सुमारे साडेचार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेंगुर्ले किनारपट्टीवरील नवाबाग किनाऱ्यावर वेंगुर्ले बंदर भागात चार रापण संघ मच्छीमारी करत आहेत. काल गुरुवारी रापणींना थोडी थोडी मासळी मिळत असल्याने रापण लावल्या जात होत्या. सुमारे 4.30 ते 5 वाजण्याच्या सुमारास योगेश्वर रापण संघाचे उत्तम आरावंदेकर, चालक रामा आरावंदेकर व व्यवस्थापक सुबोध खडपकर यांनी रापण लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक टोक किनाऱ्यावरील रापण संघाच्या सदस्यांकडे नेहमीप्रमाणे देऊन रापण लावण्याचा कार्य कार्य सुरू झाला. सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास गुलाब वादळाअंतर्गत समुद्रात निर्माण झालेल्या जोरदार प्रखर समुद्रात खेचून घेण्याच्या प्रवाहामुळे (करंटमुळे) रापण लावणारी होडी व जाळी खोल समुद्रात खेचली जाऊ लागली. सदरचा प्रकार हा रापण चालकांच्या लक्षात आल्याने रापणीची जाळी वाचविण्यासाठी रापण संघाचे मालक उत्तम आरावंदेकर, चालक रामा आरावंदेकर व व्यवस्थापक सुबोध खडपकर यांनी रापणीचे एक टोक किनाऱ्यावर दिलेल्या मच्छिमारांना हाताचे ईशारे करून रापण संघाचे व्यवस्थापक सुबोध खडपकर यांनी रापण ओढून किनाऱ्यावर घेण्यासाठी इशारा केला. त्यानुसार रापण जाळी किनाऱ्यावर वेगाने खेचण्याचा प्रयत्नही रापण सदस्यांनी केला. मात्र त्यांना रापण सदस्यांना प्रखर प्रवाहाच्या शक्तीमुळे रापण खेचून किनाऱ्यावर आणणे शक्य होत नव्हते. त्यामुळे जवेढी 12 जाळी खेचली होती. त्याठिकाणी जाळे तोडून ती वाचविण्यात यश आले. मात्र उर्वरीत रापण व जाळी वेंगुर्ले बंदरच्या दिशेने वेगाने वाहात जाऊन बंदरच्या बाहेरील असलेल्या खडकांत जाऊन पडली. व खडकांस फिट्ट बसली.
रापण होडीचा चौक ही (होडीच्या बँलन्ससाठी होडीला धरुन बांधलेले लाकडी साहित्य) तुटला. त्यामुळे रापण होडीचे नुकसानही झाले. सदर राणणीवर निर्माण झालेली परीस्थिती लक्षात घेऊन रापण व त्याची जाळी वाचविण्यासाठी वेंगुर्ले दाभोसवाडा व नवााबाग येथील मच्छिमारांनी स्वत:च्या होडय़ा आणून ती जाळी काढण्याचा रात्री उशीरापर्यत प्रयत्न केला. पण गुलाब वादळाचा ओसरत्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या लाटांमुळे अन्य होडय़ांना ती जाळी काढण्यास मिळत नव्हती. यावेळी होडय़ांकडून थोडीशी चुक झाली असती तर होडी फुटून त्यांचे नुकसान झाले असते.
यासंदर्भात आपण संघाचे मालक उत्तम आरोंदेकर, चालक रामा आरावंदेकर व व्यवस्थापक सुबोध खडपकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुलाब वादळाच्या ओसरत्या प्रभावाचा परीणामामुळे समुद्रा अंतर्गत प्रखर पाण्याचा परीणामामुळे प्रथमच अशी नैसर्गिक आपत्ती येऊन 70 जाळ्यांचे साडेचार लाख रूप्यांचे नुकसान झाले आहे. वादळाच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्तीमुळे या रापणीत मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांवर व्यवसायाचे हत्यार म्हणजे साहित्य वाहून गेल्यानेत्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. या वादळामुळे निर्माण झालेल्या आपत्तीची कल्पना वेंगुर्ले तहसिलदार तसेच मत्स्यखात्याचे अधिकारी यांना दिलेली असून शासनाने तात्काळ रापणीस नुकसान भारपाई देऊन रापणीच्या मच्छिमार सदस्यांवर व त्यांच्या कुटुंबियांवर निर्माण झालेली उपासमारी लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भारपाई द्यावी अशी मागणी करण्यांत आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा रापणीची ती जाळी काढण्यासाठी अन्य होडय़ांच्या साहाय्याने प्रयत्न केले जाणार आहेत. पण ती जाळी खडकांना घट्ट बसून राहिल्याने ती काढली तरी तुटूनच जाणार आहेत. त्यांचा उपयोग होणार नाही. असे मच्छीमारांतून सांगण्यांत आले आहे.