प्रतिनिधी/ बेळगाव
गोगटे उड्डाणपुलावरील पथदीप मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत. नव्याचे नऊ दिवस या म्हणी प्रमाणे या पुलाचे उद्घाटन झाल्यानंतर काहीच दिवस पथदीप सुरू होते. त्यानंतर अनेक महिन्यांपासून हे पथदीप बंद असून, अंधारातुन वाहने हाकण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे. यामुळे लहान मोठे अपघात घडत असून, हे पथदीप सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
हा उड्डाणपुल या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. उड्डाण पुलाचे बांधकाम झाल्यानंतर पहिल्याच पावसाळय़ात तो खचला होता. यामुळे सर्वच स्तरातून बांधकामाच्या दर्जाबद्दल टिकेची झोड उठविण्यात आली होती. त्यानंतर खचलेला रस्ता काही महिन्यांमध्ये पुन्हा करण्याची नामुष्की आली होती. त्यातच आता पथदीपांची भर पडली आहे. बेळगावचे खासदार रेल्वे राज्यमंत्री असतानाही व ते देखील याच मार्गाने अनेकवेळा प्रवास करूनही पथदीप सुरू करण्याकडे अधिकाऱयांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. या उड्डाण पुलावर नागमोडी वळण असून, रात्रीच्यावेळी नव्या वाहन चालकाला दृष्टीस न पडल्यामुळे वाहने धडकण्याचे प्रकार घडत आहेत. या पुलावर अनेक लहान मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे लावण्यात आलेले पथदिप केवळ शोभेसाठी आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वारंवार वाहन चालकांमधून मागणी करून देखील याकडे लक्ष देण्यास कोणीच तयार नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत महानगरपालिकेच्या पथदीप विभागाकडे तक्रार केली असता उड्डाण पुलावरील पथदीपांची देखभाल रेल्वे विभागाकडे येते, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका व रेल्वे विभागाने एकामेकाकडे बोट करून जबाबदारी झटकल्याने पथदीपांची दुरूस्ती कोण करणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे. रेल्वे राज्य मंत्र्यांच्या शहरातील उड्डाणपुलावरील पथदीप रेल्वे खात्याने बंद ठेवल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.