वार्ताहर / हिंडलगा
बटाटा बियाणे कुजून नुकसान झाल्याने आलेल्या नैराश्यातून गोजगे येथील शेतकऱयाने आपल्या शिवारातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. 20 रोजी सकाळी घडली आहे. अशोक कृष्णा बामणे (वय 59) रा. कलमेश्वर गल्ली, गोजगे असे मयत शेतकऱयाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशोक बामणे यांनी काही दिवसांपूर्वीच 50 पोती बटाटा बियाणांची लागवड केली होती. पण गेले काही दिवस झालेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण बटाटा बियाणे उगवण्याआधीच जमिनीत कुजून गेले आहे. शुक्रवारी (दि. 19) सायंकाळीच ते शेताची पाहणी करून गेले होते. यावेळी सर्व बटाटा बियाणे खराब झाल्याचे पाहून त्यांना धक्का बसला होता. त्यानंतर शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते गवत आणण्यासाठी म्हणून शिवाराकडे गेले होते. यादरम्यान त्यांनी शिवारातीलच एका झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर परिसरातील काही शेतकऱयांनी झाडाला मृतदेह लटकत असताना पाहून ग्रामस्थांना माहिती दिली. त्यामुळे घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी दाखल झालेल्या काकती पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी जिल्हा शवागारात पाठविला. या ठिकाणी दाखल झालेल्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे. गावातील एका प्रगतशील शेतकऱयाने आत्महत्या केल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत असून शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी होत आहे.