शिराळा/प्रतिनिधी
गोरक्षनाथ यात्रेच्या अगोदर शिराळा नगरपंचायतीने शहरात औषध फवारणी करण्याची मागणी केली जात आहे. यात्रा दोन दिवसांवर आली तरी ही नगरपंचायत प्रशासनाने गावात अजून औषध फवारणी केली नसल्यामुळे नागरिकांच्या मधून नाराजी व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
तब्बल दोन वर्षांनंतर शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रा भरत आहे. त्यामुळे शिराळा शहरातच नव्हे तर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.परंतु शिराळा शहरात स्वच्छतेचा अभाव अजून ही जाणवू लागला आहे. नगरपंचायत प्रशासनाची हातावर घडी तोंडावर बोट भुमिका दिसून येत आहे.
शहरात अनेक महीण्यांपासून औषध किंवा पावडर फवारणी केली नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. मानवी वस्तीमधील व बाजारपेठेमधील नाल्यांमध्ये ड्रेनिजच्या पाण्याचे किडे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहेत. शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रा जवळपास आठ ते दहा दिवस भरते. या यात्रेच्या पहील्या दिवशी म्हणजेच आषाढी एकादशीला पंढरपूरमधून विठ्ठल-रखुमाई स्वतः गोरक्षनाथ महाराज यांच्या भेटीला येतात अशी अख्यायिका आहे.त्यामुळे एकादशी दिवशी महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून दिंड्यांसह हजारो भाविक यात्रेमध्ये येतात. गोरक्षनाथ यात्रा आठ ते दहा दिवस भरते. त्यामुळे या काळात सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामधील हजारो भाविक गोरक्षनाथ महाराजांच्या दर्शनासाठी येतात. या काळात शहरात हजारोंची गर्दी असते. तब्बल दोन वर्षांनंतर शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रा भरणार असल्याने सध्या घरोघरी व व्यापारी वर्गात सर्वत्र घाई गडबड सुरू आहे. व्यापारी आपली दुकाने सजवण्यात तर महीला आपल्या घरी पाहुणे रावळे येणार म्हणून घर अंगण स्वच्छ करण्यात मग्न आहेत. तरी शिराळा शहरातील रस्ते व नाले स्वच्छ करून शहरात सर्वत्र औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात येत आहे