बेळगाव / प्रतिनिधी
एकीकडे शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास कामे राबविण्यात येत असताना शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या मार्गावरील पथदीप अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे वाहनचालकांना अंधारातून वाट काढावी लागत आहे. शहरातील अनेक रस्त्यांचे काम सुरू असल्याने बऱयाच ठिकाणी वाहतुक कोंडी होत आहे तर काही भागातील रस्त्याचे काम अर्धवट सोडण्यात आल्याने वाहन चालकांसह नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. बसवेश्वर सर्कल गोवावेस येथून डाक बंगल्याकडे जाणाऱया रस्त्यावरील पथदीप तब्बल तीन ते चार वर्षांपासून बंद आहेत. यामुळे या मार्गावर रात्रीच्यावेळी अनेक अपघात घडत आहेत. तरीही प्रशासनाने पथदीप तसेच हायमास्टची दुरूस्ती केली नाही. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गोवावेस सर्कलपासून शहापूरकडे जाणाऱया या दुहेरी मार्गावगील पथदीप अनेक दिवसांपासुन बंद आहेत तसेच रंगुबाई भोसले शाळेसमोर असणारा हायमास्टही बंद पडल्याने या मार्गावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. आधिच या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन चालकांना जपून जावे लागत आहे. त्यातच रात्रीच्यावेळी अंधारामुळे वारंवार अपघात घडत आहेत. या मार्गावरील पथदिपावरच झाडांच्या फांद्याही वाढल्या आहेत. मात्र त्या हटविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबरोबरच संचयनी सर्कलपासुन गोगटे सर्कलपर्यंत आणि रेल्वे स्टेशन समोरील पथदीपही बंद अवस्थेत आहेत. तरीही संबंधीत खात्याचे दुर्लक्ष झाल्याने वाहनचालकांना धोका पत्करूनच या मार्गावरून ये-जा करावी लागत आहे.