दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आवाहन,पाळी आंबेगाळ येथे खाण अवलंबितांना मार्गदर्शन
प्रतिनिधी /सांखळी
सांखळी मदतदारसंघातील खाण अवलंबितांची परिस्थिती खुपच नाजूक असल्याचे आज पाहिले. आपले आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास आम्ही प्रत्येक खाण अवलंबित कुटुंबाला खाणी सुरू होईपर्यंत महिना पाच हजार रुपये मानधन देणार आहोत. तसेच सध्या खाणीवर काम करणाऱया कामगार, ट्रक मालक, चालक मशिनरी यांचा प्रथम विचार केला जाईल. सहा महिन्यात खाणी सुरु करू. फक्त आम्हाला एक संधी द्या, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.
पाळी आंबेगाळ येथे आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सांखळीतील आम आदमी पक्षाचे उमेदवार पुती गावकर, संयोजक राहुल म्हाबरे, अमित पालयेकर, राजदीप नाईक यांची उपस्थिती होती. केजरीवाल यांनी सोमवारी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात येऊन खाण अवलंबितांशी चर्चा केली.
गोव्यात खाणी बंद झाल्यापासून खाण अवलंबित अनेक समस्यांना तोंड देत आले आहेत. सरकारही खाणी सुरु करीत नाही. आम आदमी पक्षाचे सरकार आले तर खाणी सुरू करू, अशी ग्वाही पुती गावकर यांनी खाण अवलंबितांना दिली.
सभेचे चर्चासत्रात रुपांतर अरविंद केजरीवाल यांची पाळीत सभा होणार होती. मात्र केजरीवाल आले तरी खुर्च्या रिकाम्या असल्याने शेवटी सभा रद्द करून सभेचे रुपांतर चर्चासत्रात करण्यात आले. सभेला खाण अवलंबितांची संख्या फारच कमी असल्याने आयोजकांनी हा निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले.