142 ग्रामपंचायती, 1508 जागा आणि पाच हजार 65 उमेदवार रिंगणात, वातावरण तापले
प्रतिनिधी / सांगली
आरोप, प्रत्यारोपात, जेवणावळी आणि पैशाच्या वारेमाप वापरामुळे ग्रामीण भागात प्रचाराचे रान चांगलेच तापले आहे. जिल्ह्यातील 142 ग्रामपंचायतीसाठीच्या 1508 जागांसाठी पाच हजार 65 उमेदवार रिंगणात आहेत. आज जाहीर प्रचाराची सांगता होत आहे. पण आगामी दोन दिवस उमेदवार आणि कार्यकर्त्यांना जागल्याची भुमिका पार पाडावी लागणार आहे.
जिल्ह्यात 152 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. त्यापैकी दहा गावांनी आपल्या निवडणुका बिनविरोध पार पाडल्या. तर अन्य काही गावांत दोन चार जागांसाठी निवडणुका लागल्या आहेत. एकूण 142 ग्रामपंचायतींचा रणसंग्राम रंगला आहे. पण यावेळी उमेदवारी अर्ज माघारी आणि मतदान यामध्ये आठ ते दहा दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळाल्याने उमेदवारांची धांदल उडाली आहे.
तरीही निवडणुका रंगतदार टप्प्यावर पोहोचल्या आहेत. लाखो रूपयांचा चुराडा सुरू असून घर टू घर प्रचाराबरोबर सोशल मीडियावरील हायटेक प्रचारामुळे चांगलेच रान तापले आहे. दारू आणि पाटर्Îांवर लाखो रूपये खर्च होत आहेत. बाहेरगावच्या मतदारांना संपर्क साधून त्यांच्या येण्याजाण्याची व्हीआयपी सोय करण्यात आली आहे. बाहेरगावच्या मतदारांवरही लाखो रूपयांचा खर्च होऊ लागला आहे. या निवडणुकीत जिल्हा पातळीवरील नेते आणि लोकप्रतिनिधींचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी सर्वत्र दुरंगी आणि काही ठिकणी तिरंगी सामने रंगले आहेत.
मिरज तालुक्यात आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील भाजपाबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या शिलेदारांची लढत होत आहे. जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप आणि विद्यमान आमदार विक्रम सावंत या परंपरागत गटातच जास्त ग्रामपंचायती लढवल्या जात आहेत. कवठेमहांकाळमध्ये आ. सुमनताई पाटील आणि खा. संजय पाटील यांच्या गटांची काही ठिकाणी युती झाली आहे. तर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या गटाच्याही काही ठिकाणी भाजपा, राष्ट्रवादीबरोबर स्थानिक आघाडया आहेत. तासगाव तालुक्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. पलूसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपा असा सामना रंगला असून कडेगाव तालुक्यात कदम आणि देशमुख या पारंपारिक गटातच चुरशीने निवडणुका सुरू आहेत.
खानापूर, आटपाडी या दोन तालुक्यातही आ. अनिल बाबर, आ. गोपीचंद पडळकर आणि माजी आमदार सदाभाऊ पाटील या तिघांच्या नेतृत्वाखाली निवडणूका होत आहेत. पण अनेक ठिकाणी एकाच नेत्याचे कार्यकर्ते समोरासमोर ठाकल्याने नेत्यांची गोची झाल्याचे चित्र आहे. शिराळा आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी एका ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. चार जानेवारी रोजी अर्ज माघारीनंतर जाहीर प्रचाराला सुरवात झाली. शुक्रवार 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यापूर्वी 48 तास आधी म्हणजे बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होत आहे. तेथून पुढे उमेदवार आणि कार्यकर्त्यांचा जागता पहारा ठेऊन गुप्त प्रचार सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण तापले आहे.