प्रतिनिधी / विटा
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येत आहेत. परंतु संगणक प्रणालीत होणारे आडथळे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने उद्या 30 डिसेंबर रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाईन म्हणजेच पारंपरिक पद्धतीने अर्ज स्विकारण्यासाठी निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. शिवाय अर्ज दाखल करण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. याबाबतचा आदेश प्राप्त झाल्याचे तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाने एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार संगणक प्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर आहे. या कालावधीत संगणकप्रणालीव्दारे राज्यात एकूण ३ लाख ३२ हजार ८४४ इतके नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत. मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना २८ डिसेंबर सायंकाळपासून काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. इंटरनेट गती कमी, सर्व्हर अडचण अशा तक्रारी आयोगाकडे झाल्या होत्या. याबाबत तक्रारी लक्षात घेऊन इच्छूक उमेदवार नामनिर्देशनापासून वंचित राहून नये आणि त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी यासाठी आयोगाने नामनिर्देशनपत्र पारंपारिक पध्दतीने स्वीकारण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ देखील ३०डिसेंबर रोजी शेवटच्या दिवशी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे, अशी माहिती तहसीलदार शेळके यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधितांना तातडीने पारंपारिक पध्दतीने नामनिर्देशनपत्र स्वीकारणे आणि वाढीव वेळेच्या सूचना देण्यात याव्यात. त्याचबरोबर नामनिर्देशनपत्र व घोषणापत्र यांचे कोरे नमुने इच्छुक उमेदवारांना उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी, अशा सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. पारंपारिक पध्दतीने स्वीकारलेले नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध नामनिर्देशनपत्र संगणक चालकांच्या मदतीने, संगणक प्रणालीमध्ये भरुन घेण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार शेळके यांनी दिली.