शहरात दिवसाही दिव्यांचा झगमगाट : महानगरपालिकेकडून आळा घालणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
ग्रामीण भागात अघोषित भारनियमन केले जात आहे तर दुसरीकडे शहरात विजेची उधळपट्टी होतानाचे चित्र दिसत आहे. दिवसादेखील पथदीप व हायमास्टचे दिवे सुरूच ठेवले जात असल्याने रात्रीप्रमाणे दिवसाही झगमगाट होत आहे. त्यामुळे जेथे विजेची खरी गरज आहे. तेथे अंधार तर दिवसा गरज नसताना दिवे सुरू ठेवून होणाऱया अपव्ययावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
मंगळवारी दुपारी बापट गल्ली येथील पथदीप सुरू होते. केवळ या भागातच नाही तर शहराच्या अनेक भागात दिवसा पथदीप सुरू ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. वेळच्यावेळी पथदीप सुरू व बंद करण्यासाठी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली आहे त्यांच्याकडूनच निष्काळजीपणा होत आहे. यामुळे विजेची गरज नसताना वापर होत आहे. महानगरपालिकेकडून या प्रकारांवर आळा घालणे गरजेचे आहे.