सध्या राज्यातील रुग्णसंख्येचे चित्र मेट्रो, निमशहरे आणि ग्रामीण भाग अशा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे दिसून येत आहे. काही ठिकाणी कोरोना गाशा गुंडाळतोय तर काही ठिकाणी रुग्णसंख्या अधिक तर काही ठिकाणी स्थिरावल्याचे चित्र आहे. मात्र यात वाढत्या रुग्णसंख्येचे चित्र गडद न होण्याकडे सर्वांचे प्रयत्न सुरू असले तरीही सुरू असलेल्या व्हेरियंटने स्वरुप बदलल्यास घटत्या रुग्णसंख्येच्या यशाला चकवा देणारं ठरेल का? अशी शंका अद्यापही तज्ञांच्या मनात सलत आहे…
ओमिक्रॉनच्या सामूहिक संसर्गाची सुरुवात झाली असून तिसरी लाट ओमिक्रॉनची असल्याचे यापूर्वीच सांगण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱया आणि तिसऱया लाटेतील घटणाऱया रुग्णसंख्येची, मृत्यूदराची आणि व्हेरियंटच्या बदलणाऱया शक्यतेची चर्चा आता झडू लागली आहे. राज्याच्या साप्ताहिक आरोग्य अहवालात यावर अधिक भर दिला जात आहे. अहवालातून काही सकारात्मक मुद्दे समोर येतात. जानेवारीच्या सुरुवातीच्या 22 दिवसांत कोरोना मृत्यूचे प्रमाण 37 टक्क्यांनी कमी होणे, शहरांतील रुग्णसंख्या झपाटय़ाने कमी होणे, राज्याच्या साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दरापेक्षा 25 जिह्यांतील पॉझिटिव्हिटी दर कमी असणे, आणि लसीकरणामुळे रुग्ण गंभीर न होणे हे सर्व सार्वजनिक आरोग्य विभागाने साध्य केलेले यश आहे. मात्र हे सर्व यश व्हेरियंटच्या स्वरुप न बदलण्यावर अवलंबून आहे.
दरम्यान, राज्यातील घटती-चढती रुग्णसंख्या पाहिल्यास कोरोना आणि व्हेरियंटच्या स्वरुपाचे चित्र स्पष्ट होते. 15 डिसेंबर 2021 रोजी राज्यातील 925 एवढी नोंद झालेली रुग्णसंख्या 4 जानेवारी 2022 रोजी म्हणजे अवघ्या 20 दिवसात पुन्हा 18 हजारावर गेल्याने धाबे दणाणले होते. पुढे वाढत जाऊन 12 जानेवारी रोजी 46 हजार 723 वर नोंदविण्यात आली. म्हणजेच 14 जानेवारीपर्यंत 40 हजाराच्या सरासरीत स्थिरावली. मात्र संक्रांतीच्या काळात दहा हजाराने घट होऊन 31111 एवढय़ावर पुन्हा घटली. तर 18 जानेवारी रोजी 46 हजारांवर पुन्हा गेली. आणि रविवारी ती 40 हजारावर उतरली. चार ते पाच दिवसांच्या कालावधीत सतत सुमारे चार ते पाच हजारांच्या संख्येत चढ उतार होण्याने राज्यातील कोविड गाशा गुंडाळतोय की चकवा देतोयं? असे साशंकित चित्र होते. तर याच्या नेमके विरुद्ध चित्र सध्या मुंबईत दिसून येते. तिन्हीही लाटेत मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळत असताना आता येथील रुग्णसंख्येचा आलेख कमी होताना दिसून येत आहे.
घटत्या रुग्णसंख्येचा प्रवाह कायम राहिल असा विश्वास मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला. 20 जानेवारी रोजी मुंबईतील रुग्णसंख्या वाढली होती. मात्र तेव्हापासून ही रुग्णसंख्या कमीच होताना दिसून येत असल्याने मुंबईत निश्चितच घसरण सुरू असल्याचे मत काकाणी यांनी मांडले. राज्याच्या तुलनेत मुंबईत रुग्णसंख्येत घटच होत आहे. तर राज्यात किरकोळ ठिकाणी वाढताना दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यापासून गेल्या चार महिन्यांच्या तुलनेत नव्या वर्षाच्या 22 जानेवारीपर्यंत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असल्याचे राज्याचा आरोग्य विभागाचा साप्ताहिक कोविड अहवाल सांगतो. सप्टेंबर महिन्यात 1 लाख 6 हजार 41 रुग्णांची नोंद होती. तर नव्या वर्षाच्या 22 जानेवारीपर्यंत 6 लाख 43 हजार 261 एवढे एकूण रुग्ण आढळले. या 22 दिवसांत दररोज सरासरी 33,856 रुग्ण आढळून येत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे. मात्र याच्या तुलनेत चार महिन्यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये ही दैनंदिन सरासरी 3,535 इतकी होती. तर दुसऱया बाजूला 22 जानेवारी रोजी 298 मृत्यू नोंद करून मृत्यूदर 0.05 टक्क्यावर आल्याचे साप्ताहिक अहवाल सांगतो.
या तुलनेत गेल्या चार महिन्यात मृत्यूदर बदलत असल्याचेही दिसून आले. जसे डिसेंबर महिन्यात मृत्यूदर 0.53 टक्के, नोव्हेंबर 1.79 टक्के, ऑक्टोबर 1.78 टक्के, तर सप्टेंबर महिन्यात 1.62 टक्के एवढा मृत्यू दर नोंदाविण्यात आला होता. नोव्हेंबर महिन्यात एकूण 471 कोविडने मफत्यू झाले. त्या तुलनेत 22 जानेवारीपर्यंत 298 कोविड मृत्यूची नोंद करण्यात आली. म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत नव्या वर्षाच्या 22 दिवसांत कोरोना मृत्यूदर 37 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येत आहे. तर सप्टेंबर महिन्याच्या मृत्यूदराशी जानेवारीतील मृत्यूदराशी तुलना केल्यास मृत्यूदर 0.05 टक्क्यांवर आला असल्याचे समोर येते. राज्यात रुग्णसंख्या वाढती असली तरीदेखील मृत्यूसंख्या घटती असल्याचे आशादायी चित्र आहे. मात्र मुंबईतील चित्र वर्षाच्या पहिल्या आठवडय़ात चिंता देणारे होते. मुंबईत 20 डिसेंबर रोजी 191 रुग्णनोंद झाली होती. पुढे टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन वर्षाच्या सुरुवातीला हजारावर गेली. तर 10 जानेवारी रोजी 20 हजार 971 एवढय़ावर गेली होती.
आता घट होऊन कालच्या रविवारी 2550 एवढय़ावर आली. मात्र 20 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत रुग्णसंख्या सतत चकवा देणारी होत असल्याचे समोर येत होते. राज्य आणि मुंबई या दोन्ही ठिकाणांवरील रुग्णसंख्या तफावतीवर चुकवलेले लसीकरण असे उत्तर तज्ञांकडून मिळत आहे. राज्याचे आरोग्य विभाग तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांच्या मते राज्यात वेगवेगळ्या स्तरावर रुग्णसंख्येचे वेगळेवेगळे चित्र पहावयास मिळत आहे. मुंबईसारख्या मेट्रो शहरांमधील चित्र तसेच मेट्रोंना लागून असलेल्या छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत आज तफावत दिसून येत आहे. मुंबईत रुग्ण कमी होत असताना निमशहरी भागात तसेच ग्रामीण भागात संख्या वाढताना दिसून येत आहे. हा निरीक्षणाचा काळ असून सध्या सुरू असलेला व्हेरियंटचे स्वरुप आहे तसेच राहिल्यास तिन्ही भागातील रुग्णसंख्येत घट कायम राहिल. मात्र व्हेरियंटने स्वरुप बदलल्यास घटत्या रुग्णसंख्येला चकवा देणारे ठरु शकते. अशी शंका तज्ञांनाही सलत आहे. तसे झाल्यास संसर्गाला कोंडीत पकडण्यास बदलत्या स्वरुपानुसार बदलते उपायही करावे लागतील.
राम खांदारे