मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा : पूरग्रस्तांना दिलासा, दुरुस्तीची कामे हाती घेण्यासाठी 660 कोटी , पुरामुळे 13 बळी
प्रतिनिधी /बेंगळूर
मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे घरे गमाविलेल्या पूरग्रस्तांना 5 लाखांची नुकसानभरपाई देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली. तसेच पुरामुळे हानी झालेल्या भागात दुरुस्तीकामे तात्काळ हाती घेण्यासाठी 660 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरपरिस्थितीबाबत रविवारी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या घोषणेमुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री बोम्माई पुढे म्हणाले, पावसाचा जोर कमी झाला आहे. तरीही कृष्णा नदीकाठ, बेळगाव, उत्तर कर्नाटक आणि उडुपी जिल्हय़ासह एकूण 13 जिल्हय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे राज्यातील 466 गावांना पुराचा फटका बसला असून महापूर आणि पावसाने आतापर्यंत 13 जणांचा बळी घेतला आहे. तर अद्याप दोघेजण बेपत्ता आहेत. पावसामुळे 75 टक्के घरांचे नुकसान झालेल्यांना 5 लाख रुपये, निम्मे नुकसान झालेल्यांना तीन लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल. याचबरोबर घरांचे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना तात्काळ 10 हजार रुपयांची आपत्कालीन मदत देण्याची सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले. महापुरामुळे अनेक रस्त्यांच्या संपर्क तुटला असून बंधाऱयांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ त्याचे काम हाती घेतले जाईल. एनडीआरएफ निधीतून 150 कोटी आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांजवळ 700 कोटी रुपये निधी आहे. तसेच घरे पिकांसह इतर हानीची पाहणी करून 15 दिवसात अहवाल देण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. गेल्यावर्षी पुरामुळे घरांचे नुकसान झालेल्यांचे काम प्रगतीपथावर असल्यास त्यांची उर्वरित रक्कम तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यात पाऊस आणि पुरामुळे नुकसान झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठविण्याची मागणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.