बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचाही वेग वाढविण्यास सांगितले आहे. आता राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. पण लसीच्या कमतरतेमुळे हे लसीकरण काही दिवसांनी पुढे ढकलले आहे. दरम्यान जनता दल (सेक्युलर)चे नेते व माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी गुरुवारी राज्य सरकारकडे कोविड -१९ चा प्रसार कमी करण्यासाठी १८ किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्व मुलांसाठी सक्तीचे डोअर-टू-डोअर लसीकरण सुरू करण्याची विनंती केली.
“राज्यात कर्फ्यू सुरू असल्याने, सरकारने परिस्थितीचा पुरेपूर फायदा घ्यावा आणि सर्व १८ वर्षा पेक्षा जास्त लोकसंख्येची डोर-टू डोर सक्तीचे लसीकरण सुरू करावे जेणेकरून लोकसंख्येचा आत्मविश्वास वाढेल आणि कोविडचा प्रसार रोखता येईल,” असे ते म्हणाले.
कुमारस्वामी यांनी ट्विट करत लस पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने राज्यातील ४५ वर्षांवरील अनेकांना प्रथम डोस मिळालेला नाही. “आणि ४५-६० वयोगटातील बहुतेकांना दुसरा डोस मिळालेला नाही. कर्नाटक सरकार आणि भारत सरकार यांच्यातील बोलणीनंतर पुरेसा लस पुरवठा होणार का? ” असे त्यांनी विचारले.