तब्बल दहा दिवसांचे स्वयंस्फूर्त लॉकडाऊन यशस्वी : सक्रिय रुग्णसंख्या शून्य
तेजस देसाई / दोडामार्ग:
कोणत्याही गोष्टीचा चांगल्या-वाईट याचे मूळ आपण स्वतः आहोत हे एकदा समजले की स्वत्वाची जाणीव होते. दुसऱयावर ढकलण्याची वृत्ती थांबते. सध्या कोरोनाच्या बाबतीत सरकार काय करते ? हा सवाल अनेकजण विचारत आहेत. पण, आपण हा संसर्ग थोपविण्यासाठी मदत करतोय काय ? हा खरा सवाल आहे. मात्र, घोटगेवाडी गावाने स्वतःला विचारलेल्या प्रश्नाने त्यांनी अशी काय कोरोनावर मात केली की स्वतः लॉकडाऊनचा निर्णय घेतला व कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आणली. अन्यथा 31 रुग्ण अशी संख्या असलेल्या गावात कोरोनाचा विस्फोट झाला असता हे नक्की. 31 मे ला दहा दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण होत आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱयात येणारा घोटेवाडी गाव तालुक्यात कोणालाही विचारला तरी बारा बलुतेदार, शिक्षक आणि संगीत नाटय़परंपरेची जोपासना करणारा अशी या गावाची ओळख मिळेल. आता तर प्रगतशील शेतकरी म्हणून येते सुशिक्षीत वर्गाने आपल्या रोजगाराचा मार्ग निवडला आहे. कोरोनामुळे अनेक गावे बाधित झाली आहेत. सरकारच्यावतीने अनेक उपाययोजना हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात आहेत. तरीही पूर्ण नियंत्रणात कोरोना येईना, अशी आजची स्थिती आहे. गावागावात रुग्ण आढळत असल्याने नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘कोरोना मुक्त गाव’ याविषयी प्रबोधन ही सुरू केले. मात्र, त्यापूर्वी दहा दिवस आपल्या गावातील कोरोना हद्दपार व्हावा, म्हणून गावाने स्वतः पुढे येत दहा दिवसांचे लॉकडाऊन केले व दहा दिवस कडक पाळलेही. ग्रामपंचायत कमिटी, सनियंत्रण समिती, ग्रामस्थ यांनी निर्णय घेतल्यावर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरोग्य विभाग यांचेही त्यांना सहकार्य मिळाले. घोटगेवाडी गावाने ज्याप्रमाणे स्वतः निर्णय घेत अंमलबजावणी केली त्याचे प्रशासन स्तरावर कौतुक होत आहे.
अखेर रुग्ण संख्या शून्यावर प्रत्येक घटकाचे सहकार्य
22 मे पासून सकाळी सात ते 31 मे सायंकाळी सात असा लॉकडाऊनचा काळ होता. या काळात जंतुनाशक फवारणी, प्रबोधनपासून अनेक गोष्टीत येथील ग्रामपंचायतीला युवक, ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले. खरं तर जवळपास 1500 लोकसंख्या आणि 9 वाडय़ांमध्ये विस्तारलेल्या गावात लॉकडाऊन करणे आणि ते यशस्वी करणे शक्य नव्हते. मात्र, अनेकांनी नोकरीची सुट्टी घेतली. जे किरकोळ जायचे त्यांनी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था केली. ग्रामस्थ घराबाहेर पडलेच नाही. दुकाने पूर्णतः बंद होती. सर्व घटकांचे सहकार्य मिळाल्याने कोरोनाला रोखण्यात यश आल्याचे उपसरपंच भालचंद्र कुडव यांनी सांगितले.
सध्या ऍक्टिव्ह रुग्ण शून्य
स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन केल्यामुळे या गावात सकारात्मक परिणाम जाणवला. 31 रुग्णसंख्या असलेली आता आठपर्यंत आली. शिवाय गेल्या चार दिवसात एकही रुग्ण सापडलेला नाही.