प्रतिनिधी / साटेली-भेडशी:
मंगळवारी सकाळी घोटगेवाडी गावचे पोलीस पाटील विश्राम गोविंद दळवी हे येथील कॉजवेवरून चालत जात असताना वाहून गेल्याची घटना घडली.
दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी गावचे पोलीस पाटील विश्राम दळवी हे भेडशी येथून घोटगेवाडी येथे आपल्या गावी कोनाळकट्टा मार्गे घोटगेवाडी येथील कॉजवेवरून जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने चालत असताना या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. दळवी कॉजवेवरून जाण्यापूर्वी अनेकजण या कॉजवेवरून चालत गेले होते. तर काही वेळापूर्वी काहीजण चालत गेल्याने तेही कॉजवेवरून जात चालत जात असताना पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने त्यात ते वाहून गेल्याची घटना घडली. ही घटना कॉजवेच्या दुसऱया बाजूला असणाऱया एका व्यक्तीने पाहिली. त्याने याची इतरांना माहिती दिली. त्यानंतर दिवसभर त्यांची शोधमोहीम सुरू होती. सायंकाळी उशिरापर्यंत ही शोधमोहीम सुरू होती. मात्र, मृतदेह मिळाला नाही. या शोधमोहिमेत घोटगेवाडी
ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. मोर्लेचे माजी सरपंच गोपाळ गवस यांनी या घटनेची माहिती जिल्हा आपत्कालीन विभागाला देऊन शोधमोहिमेत गती येण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण केले. बाबल आल्मेडा टीम पाठविण्याची व्यवस्था करणार असल्याची माहिती गवस यांनी दिली. घटनास्थळी नायब तहसीलदार संजय कर्पे यांनी भेट दिली. दरम्यान, जलसंपदा विभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
अचानक आलेल्या पाण्याने घेतला बळी
तिलारी जलसंपदा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे अचानक धामणे धरण येथील वीजनिर्मिती करून सोडल्या जाणाऱया पाण्याचा प्रवाह अचानक सोडल्याने तिलारी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे घोटगेवाडी येथील कॉजवेवर पाणी वाढल्याने पोलीस पाटील वाहून गेले. या घटनेला जलसंपदा विभाग जबाबदार असल्याचा आरोप उपसरपंच भालचंद्र कुडव यांनी केला आहे.