700 ते 800 रुपये प्रतिकिलो दर : चंद्रप्रकाश मंदावल्यानंतर येणार न्हैय मासेमारीला वेग
मालवण
बातमीचा मथळा वाचून क्षणभर सर्वांना आश्चर्य वाटले असेल. चंद्रप्रकाशाचा सुरमईशी काय संबंध, असा प्रश्नसुद्धा पडला असेल. परंतु चंद्रप्रकाश आणि सुरमई माशाचा नक्कीच संबंध आहे, असे जाणकार मच्छीमार सांगतात. ज्या दिवसांमध्ये चंद्रोदय लवकर असतो अन् चंद्र मोठा असतो, तेव्हा एरव्ही वेगाने पळणारे सुरमईसारखे मासे रात्रीच्यावेळी काहीसे स्थिरावलेले असतात. स्थानिक बोलीत सांगायचे तर ‘मासो उभो होता.’ त्यामुळे याकाळात मोठी सुमरई (इसवन) जाळय़ात अडकण्याचे प्रमाण प्रचंड घटते.
मालवणात सुरमई खरेदी करायल<ा ठिकठिकाणचे लोक गर्दी करतात. परंतु मत्स्य खवय्यांच्या लाडक्या सुरमईचे दर सध्या कडाडले आहेत. काही दिवसांपूर्वी सुरमईला प्रति किलो 400 ते 500 रुपये भाव होता. पण गेल्या दोन दिवसांमध्ये हा भाव कमालीचा वाढला आहे. रविवारी प्रति किलो 800 ते 700 रुपये असलेला भाव सोमवारीसुद्धा सातशेच्या घरातच होता. अर्थात गेल्या तीन दिवसांत पर्यटकांच्या विक्रमी गर्दीचा सुरमईला फायदा झालाच. परंतु बाजारात सुरमईची आवक पुरेशी नव्हती हीदेखील वस्तुस्थिती आहे.
न्हैयवाल्यांचे प्रमुख कॅच सुरमई
बल्यावांद्वारे गिलनेट प्रकारातील ‘न्हैय’ मासेमारी करणाऱया मच्छीमारांचे प्रमुख कॅच सुरमई आहे. न्हैयवाल्या मच्छीमारांना विचारले असता ते म्हणाले, सुरमईला सध्या चांगला भाव मिळतोय, याचे कारण बहुतांश बल्यावधारक मच्छीमारांनी आपली मासेमारी बंद ठेवली आहे. ठराविक बल्यावधारकच मासेमारीस जात आहेत. याचे कारण सध्या चंद्र मोठा आहे आणि चंद्रोदय लवकर आहे. लवकर आहे म्हणजे न्हैय व्यावसायिक दिवस मावळतीला येऊ लागला, की आपली जाळी टाकतात. रात्री 11 किंवा 12 वाजता, तर कधी-कधी पहाटे 3 वाजता जाळी ओढण्याचे काम ते हाती घेतात. जाळी टाकण्याच्या आणि ओढण्याच्या दरम्यान रात्रीच्यावेळी पूर्ण चंद्रदर्शन असेल, तर त्या प्रकाशामुळे आमचा प्रमुख कॅच असलेला सुरमई मासा वेगाने पळत नाही. कारण चंद्राच्या प्रकाशामुळे समुद्रातील पाण्याला जारा (चकाकी) येत नाही. चंद्रप्रकाश भरपूर नसतो, तेव्हा काळोखात समुद्राच्या पाण्यात जाऱयाचे प्रमाण जास्त असते. परिणामत: चकाकीमुळे माशांच्या हालचाली दिसून येतात. या जाऱयाच्या आधारे रात्रीच्यावेळी सुरमईसारखे मासे आपल्या भक्ष्याचा वेगाने पाठलाग करतात. लख्ख चंद्रप्रकाशावेळी सुरमईला त्याचे भक्ष्य असलेले इतर मासे नीट कळून येत नाहीत. त्यामुळे समुद्रातील त्याचा संचार मंदावतो. सुरमई मासा वेगाने पळत नाही. परिणामत: न्हैयच्या जाळय़ांमध्ये सुरमई अडकण्याचे प्रमाण खूप कमी होते. पौर्णिमेनंतर जसजसा चंद्राचा आकार कमी होत जातो, तसतसा समुद्राच्या पाण्यात बऱयापैकी काळोख पसरतो आणि त्याचा फायदा न्हैयधारक मच्छीमारांना होतो. साधारणपणे 25 डिसेंबरपासून न्हैय मासेमारी काहीशी थंडावल्याचे दिसते. 30 डिसेंबर रोजी सकाळी 8.57 वाजता पौर्णिमा संपणार आहे. नंतर 2 जानेवारीला संकष्टी आहे, असे मच्छीमारांनी सांगितले.
बांगडा, तारलीसाठी चंद्र चांगला
सुरमई पकडण्यासाठी चंद्रप्रकाश अनुकूल नसल<ा, तरी बांगडा, तारली यासारखे छोटे मासे जाळय़ात येण्यासाठी चंद्रप्रकाश पोषक असल्याचे मच्छीमार सांगतात. थव्याने संचार करणारे हे मासे चंद्रप्रकाशाच्या दिशने किनाऱयालगत धावून येत असतात. या काळात शेंगाळय़ासारखा मासा जमीन धरतो. म्हणजेच समुद्रतळाशी जातो. समुद्रतळाशी तो खटवीला भक्ष्य बनवतो, असे मच्छीमार सांगतात.
एलईडी मासेमारीही प्रभावहीन
पारंपरिक मच्छीमार सांगतात, आम्ही बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारीविरोधात संघर्ष करतोय हे आपणास माहितीच आहे. चंद्रप्रकाशावेळी एलईडी दिव्यांच्या साहय़ाने होणारी मासेमारीसुद्धा फारशी किफायतशीर ठरत नाही. याकाळात एलईडी लाईटसचा एरव्हीपेक्षा माशांवर प्रभाव काहीसा कमी होतो. काही दिवसातच चंद्रप्रकाश मंदावल्यानंतर शासनाच्या दुर्लक्षामुळे एलईडी मासेमारी पुन्हा जोमाने सुरू झालेली आपल्याला दिसेल. त्याचा फटका पारंपरिक बुडाव व मांडधारक गिलनेटवाल्यांबरोबरच आम्हा न्हैयवाल्यांनाही बसेल.