ऑनलाईन टीम / तरुण भारत
गेल्या दोन दिवसांपासुन हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाच्या शक्यतेनुसार कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असुन मच्छीमारांनी जवळच्या बंदरावर सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, असे आवाहन सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे शनिवारी दिवसभर रत्नागिरी जिल्ह्यात ही ढगाळ वातावरण आणि हलका वारा होता. त्याचा परिणाम हापूसवर होण्याची शक्यता ही कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर बंगालच्या उपसागारात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
या वादळाचा कोकण किनारपट्टीवर काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही. पण त्या भागातील नौकांना गरज पडल्यास आश्रय देण्याची, तसेच सावधगिरीचा उपाय म्हणून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्यांनी जवळच्या बंदरांचा आधार घ्यावा, अशी सूचना करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यत मागील आठवडाभर उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तापमानातील अंतर १५ अंश सेल्सिअसपर्यंत होते. कमाल तापमान ४० अंशांपर्यंत नोंदले गेल्याने उष्मा देखील वाढला आहे.