राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा
प्रतिनिधी /मडगाव
काँग्रेस पक्षाने दिल्लीत गोवा फॉरवर्डकडे चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवल्याने राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव हे संतप्त झाले आहेत. काँग्रेस पक्षाने जरी आत्ता राष्ट्रवादीकडे बोलणी केली तरी आपण त्या पक्षाकडून निवडणूक लढविणार नसल्याचे चर्चिल आलेमाव यांनी काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
आपण पुढील आठवडय़ात नव्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्या पक्षाचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दर्शविला.
आपण कलकत्ता भेटीवर होतो व त्या ठिकाणी आपण ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याची माहिती चर्चिल आलेमाव यांनी पत्रकार परिषदेत दिली. 29 नोव्हेंबर रोजी आपण आपल्या भावी राजकीय वाटचालीची माहिती देणार असल्याचे या पूर्वी सांगितले होते. मात्र, 29 नोव्हेंबरपर्यंत चर्चिल आलेमाव यांनी कोणतीच घोषणा केली नाही. आत्ता पुढील आठवडय़ात आपण नव्या राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी नव्याने केली आहे.
शरद पवारांनी सांगितले तरी काँग्रेसकडे युती नको
काँग्रेस पक्षाकडे युती करावी यासाठी आपण स्वतः प्रयत्नशील होतो. आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची भेट घेऊन युतीची बोलणी करावी असा प्रस्ताव दिला होता. मात्र, गणेशचतुर्थी नंतर बोलणी करू असे सांगण्यात आले. गणेश चतुर्थी संपली तरी काहीच झाले नाही. त्यानंतर दिवाळी नंतर बोलणी करू असे सांगण्यात आले. दिवाळी देखील झाली. पण, युतीची बोलणी होईना. त्यामुळे आपण वालंका आलेमाव यांना सोबत घेऊन मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली व युतीची लवकर बोलणी करावी अशी मागणी केली. तरी देखील युतीच्या संदर्भात बोलणी होत नसल्याने आपल्याला पर्यायी मार्ग निवडावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. आत्ता जरी शरद पवारांनी युती करू व निवडणूक लढवू असे सांगितले तरी आपला त्याला विरोध असेल असे चर्चिल म्हणाले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अशाच पद्धतीचे राजकारण खेळले होते. त्यातही जनतेच्या पाठिंब्यावर आपण बाणावली मतदारसंघातून विजयी झालो. नंतर सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दर्शविणारे पत्र लुईझिन फालेरो यांच्याकडे सुपूर्द केले होते. आपल्या सोबत त्यावेळी आणखीन दोन आमदार होते व एक अपक्ष आमदार पाठिंबा देणार होता. मात्र, त्यावेळी काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदामुळे लुईझिन फालेरो राज्यपालांना सरकार स्थापन करण्यासाठी निवेदन देऊ शकले नाही. त्यानतंर गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा देऊन भाजपचे सरकार सत्तेवर आणले असे चर्चिल म्हणाले.
भाजपचे घटक असलेले काँग्रेस सोबत कसे ?
गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई हे जबाबदार होते. ते एनडीएचे घटक होते. ते आत्ता काँग्रेस सोबत कसे असा सवाल चर्चिल आलेमाव यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेस पक्षच राज्यात भाजपला मदत करीत असून काल जे काही दिल्लीत घडले, त्याचेच एक उदाहरण असल्याचा दावा चर्चिल यांनी केला. भाजपला खऱया अर्थाने टक्कर देणाऱया राजकीय पक्षात आपण प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाणावली मतदारसंघातील त्याचे समर्थक तसेच पंच सदस्य उपस्थित होते.