चला पंढरीसी जाऊ । रखुमादेविवरा पाहू ।।1।। डोळे निवतिल कान । मना तेथे समाधान ।।2।। संता महंता होतील भेटी । आनंदे नाचों वाळवंटी ।।3।। ते तीर्थांचे माहेर । सर्व सुखाचे भांडार ।।4।। जन्म नाही रे आणिक । तुका म्हणे माझी भाक ।।5।।
अर्थात ‘चला आपण सर्व मिळून पंढरपूरला जाऊ आणि रुक्मिणीपती ‘श्रीकृष्ण’ यांचे दर्शन घेऊ. तेथे त्यांचे दर्शन घेतल्याने आपल्या डोळय़ांना फार सुख प्राप्त होईल आणि त्यांच्या नामाचा घोष ऐकून आपल्या कानांचे समाधान होईल. तेथे संतमहंतांच्या गाठीभेटी होतील, त्यांच्या संगतीत हरिकीर्तन करीत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आनंदाने नाचू, गाऊ. पंढरपूर हे सर्व तीर्थांचे माहेरघर आहे आणि सर्व सुखाचे भांडार आहे. पंढरपूरला गेल्यावर तुम्हाला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही हे मी शपथेवर सांगतो.’ संत तुकाराम महाराज सर्व विठ्ठलभक्तांना संबोधून या अभंगात पंढरीच्या वारीचे निमंत्रण देत आहेत. तीर्थयात्रा हा वैदिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. सामान्यतः आपले आयुष्य कायम दैनंदिन व्यवहारामध्ये गुरफटून गेलेले असते. त्यामुळे मनुष्य देहाचे सार्थक ज्यामध्ये आहे ते भगवत प्रेम प्राप्त करणे या जीवनाच्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष होते. त्यासाठी काही वेळ केवळ भगवत चिंतन करण्यासाठी तीर्थयात्रा करण्यास वैदिक शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यातही विशेषतः चतुर्मासामध्ये भगवत भक्तीला विशेष महत्त्व आहे. यासाठी सर्वजण आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये एकत्र जमतात. शेकडे वर्षांपासून चालत आलेल्या या विशेष सोहळय़ामध्ये लाखो लोक सहभाग घेतात. जे प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत ते आपापल्या गावामध्ये, घराघरामध्ये दरररोज सकाळ संध्याकाळ हरिकथा, हरिकीर्तन करतात.
यंदा सतत दुसऱया वषीही कोरोनाच्या प्रभावामुळे बहुतेक वारकरी-भक्त पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्येही एका वषी असाच एक प्रसंग घडला आणि ते पंढरपूर वारीला जाऊ शकले नाहीत. तुकाराम महाराजांनी आषाढी कार्तिकीला पंढरपूरची वारी कधी चुकविली नाही. पण एकदा ते खूप आजारी असल्यामुळे पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. त्यांना थंडी तापाचा त्रास होऊन खूप अशक्तपणा आला होता. एक पाऊलही उचलण्याची शक्ती त्यांच्या अंगात नव्हती. पंढरपूरला जाता येणार नाही याचे दुःख त्यांच्या हृदयामध्ये होते. तुकारामांच्या प्रचारामुळे अनेक लोकांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणांचा आश्रय घेतला होता व ते हरिनाम संकीर्तन करीत होते. ते सर्व वैष्णव भक्त त्या दिवशी दिंडय़ापताका घेऊन टाळ मृदंगाच्या गजरात हरिनाम करत आपल्याबरोबर तुकारामांनाही पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी देहू येथे त्यांच्या घरासमोर आले. तुकारामांनी त्यांचे स्वागत केले आणि परिस्थितीची जाणीव त्या जमलेल्या भक्तांना करून दिली. त्या भक्ताबरोबर तुकारामांनी साश्रूपूर्ण नयनांनी काही अभंगरूपात निवेदनपत्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीसाठी दिले. ते पत्र घेऊन सर्व वारकरी भक्त पंढरपूरला आले.
पंढरपूरच्या पवित्र भूमीचा स्पर्श होताच सर्वाना अत्यानंद झाला. सर्वानी चंद्रभागेच्या शीतल जलामध्ये स्नान केले व काठावरील मंदिरात भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वांनी नाचत, गात, हरिनाम संकीर्तन करीत पंढरपूरमध्ये नगर संकीर्तन केले. मग महाद्वारासमोर येऊन सद्भावे दंडवत घातले. त्यानंतर आत गरुड स्तंभाजवळ येऊन त्यांनी ते सर्व अभंग पांडुरंगासाठी वाचले. नंतर त्यांनी तुकारामांचे पत्र पांडुरंगाच्या हातात दिले व म्हणाले, ‘तुकारामांची प्रकृती खूप खालावली आहे आणि इतक्मया दूरपर्यंत ते चालू शकत नाहीत म्हणून त्यांनी आपणासाठी हे पत्र लिहिले आहे. आपण भक्तवत्सल करुणामूर्ती आहात, सर्वज्ञ आहात. आपणास आम्ही सांगण्याची गरज नाही.’ तुकाराम आजारी आहेत हे ऐकून पांडुरंगाचे डोळे पाणावले. त्यांनी विचार केला, तुकाराम माझा निजभक्त आहे, आजारी व अशक्त असल्याने पंढरपूरपर्यंत येऊ शकत नाही तर आपणच देहूला जाऊन त्याला भेटू. आपल्या मनातले विचार त्यांनी रुक्मिणीला सांगितले. रुक्मिणीने त्याना सांगितले की इकडे अनेक भक्त आपल्या दर्शनासाठी जमले आहेत त्याचा विचार करावा आणि आपले वाहन गरुड यांना तुकारामांना इकडे आणण्यासाठी पाठवावे. रुक्मिणीच्या या सूचनेनुसार गरुडाला तुकारामांना आणण्यासाठी देहूला जाण्यास सांगण्यात आले. गरुड जेव्हा देहूला आले तेव्हा त्यांनी तुकारामांना त्यांच्या पाठीवर बसून पंढरपूर येथे पांडुरंगाने येण्यास सांगितले आहे असा निरोप तुकारामांना दिला. त्यावर गरुडाला तुकाराम नम्रपणे म्हणाले ‘असे अनुचित वर्तन मी कसे करू? आपण माझ्या स्वामींचे वाहन आहात. मी केवळ त्यांच्या पादुकांचा वाहक आहे. पायातले अलंकार सोन्याचे असले तरी कोणी डोक्मयावर घालत नाहीत. माझा हा संभ्रम पांडुरंगाला सांग’ असे म्हणत गरुडाच्या पाठीवर बसण्यास नकार देत त्याच्या चरणावर मस्तक ठेवले.
तुकाराम वैकुंठनायकाचे चिंतन करत देहूतच राहिले. त्यानंतर भक्तवत्सल विठ्ठल भगवान रुक्मिणीसहित स्वतः तुकारामांना भेटण्यासाठी देहूत आले. तुकारामांचा आनंद गगनात मावेना. तुकारामांचे घर मोडकळीस आलेल्या अवस्थेत होते. छप्परसुद्धा नीट नव्हते. अशा घरात आल्यावर तुकारामांनी पांडुरंगाची मनापासून सेवा केली. तुकारामांच्या पत्नीने त्यांच्यासाठी भाजी भाकरी बनविली. ती भगवंतांनी आनंदाने स्वीकारली. भगवंत भक्तीने आपल्या भक्तांच्या प्रेमात बांधले जातात आणि म्हणूनच भगवंतांनी तुकारामांची प्रामाणिक, निस्सीम भक्ती पाहून त्यांच्या घरी साधी भाजी भाकरी खाऊन तृप्त झाले. त्यानंतर तुकारामांनी भगवंतांना मुखशुद्धीसाठी तुळशीचे पान दिले. अशी तुकारामांची प्रेम भक्ती स्वीकारून भगवंत प्रसन्न झाले व आनंदाने तुकारामांचा निरोप घेऊन पंढरपूरला परतले. स्कंद पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात पंढरपूरला आले त्यावेळी त्यांनी आपला भक्त पुंडलिकालाही आपले दर्शन दिले. त्याची भक्ती पाहून पुंडलिकाला वर मागण्यास सांगितले असता त्याने भगवंतांना विनंती केली की कलियुगातील पापी, अधर्मी, दुराचारी, दुर्गुणी अशा लोकांना केवळ आपल्या दर्शनाने आपली भक्ती प्राप्त व्हावी त्यासाठी आपण पंढरपुरताच वास्तव्य करून राहावे. पुंडलिकाच्या विनंतीला स्वीकारून पांडुरंग आजही आपल्या भक्तांचे प्रेम स्वीकारत पंढरपूरमध्ये आपल्या भक्तांची वाट पाहत कमरेवर हात ठेवून उभे आहेत. या श्रद्धेने सर्व भक्त लाखेंच्या संख्येने पंढरपूरला भेट देतात. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत चतुर्मास असतो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीही म्हणतात.
या दिवसापासून भगवान विष्णू अनंत शेषनागावर शयन करतात आणि कार्तिक एकादशी दिवशी ज्याला उत्थान एकादशी असेही संबोधिले जाते या दिवशी भगवंत उठतात. आपण ज्या सुखासाठी या जगामध्ये धडपडत आहोत, कष्ट करीत आहोत ते सर्व सुख विठ्ठलभक्तीमध्ये आहे एवढेच नाहीतर जन्म मृत्यू जरा व्याधी या दुःखापासून कायमचे मुक्त करण्याचे सामर्थ्य विठ्ठल दर्शनामध्ये आहे. तेच विठ्ठल कलियुगामध्ये आपल्याच नामामध्येही अवतीर्ण झाले आहेत. या हरिनामाचा आश्रय जे घेतात त्याला भगवान श्रीकृष्ण पंढरपूरमध्ये आजही दर्शन देतात. तुकाराम महाराज या विठ्ठल रूपातील श्रीकृष्णाचे वर्णन करताना म्हणतात,
स्वयंभू अमुचा विटेवरी उभा । चैतन्याचा गाभा पांडुरंग ।।1।। नाही घडविला नाही बैसविला । पुंडलिका आला भेटावया ।।2।। द्वारकेची अवघी घेवोनि संपत्ती । आले हृषीकेशी पंढरीशी ।।3।। तुका म्हणे मूर्ती घडविली जे म्हणती । त्याच्या मुखाप्रती किडे पडो ।।4।।
वृंदावनदास