पश्चिम आणि मध्य आशियात निर्माण झालेल्या धर्मामध्ये सर्वात प्राचीन ज्यू धर्म, नंतर झरतृष्ट्राचा धर्म व नंतर कित्येक शतकांनंतर स्थापन झालेले ख्रिश्चन आणि इस्लाम असे मिळून चार धर्म आणि भारतात उगम पावलेले हिंदू, बौद्ध, जैन व शीख हे चार धर्म असे मिळून एकूण आठ धर्म हेच आजच्या जगभरातील मानवांचे महत्त्वाचे धर्म आहेत. जगात हिंदू धर्म सर्वात प्राचीन आहे असे म्हटले जात असले तरी ज्याच्यातून हिंदू धर्म किंवा जीवनपद्धती विकसित झाली झाली तो सनातन धर्म हा सर्वात प्राचीन होय. या आठांपैकी जैन व बौद्ध हे दोन धर्म ‘मूलतः ईश्वर न मानणारे’ धर्म असून त्यांच्याव्यतिरिक्त उरलेल्या सहाही धर्मात माणसाने मानसिक आधारासाठी कसला तरी ईश्वर मानलेला, कल्पिलेला आहे. खरेतर धर्म ही मानव कल्याणासाठी अस्तित्वात आलेली समाजव्यवस्था आहे. त्यादृष्टीने श्रीमद् शंकराचार्यांनी धर्माची केलेली व्याख्या अधिक समर्पक वाटते. ते म्हणतात, ‘समाजव्यवस्था उत्तम राहणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती होणे, या गोष्टी ज्याच्यामुळे साध्य होतात तो धर्म.’
हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमी या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजल्या गेलेल्या प्रभू रामाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस देशभरात दरवषी रामनवमी (रामजन्मोत्सव) म्हणून साजरा करतात. संशोधक आणि काही प्रमाणे असे सांगतात की रामाचा जन्म इसवी सन पूर्व 5114 साली 10 जानेवारी रोजी झाला होता. याचा अर्थ असा की 5114+2021 बरोबर 7135 वर्षांपूर्वी प्रभु रामचंद्र जन्माला आले होते. हा शोध वाल्मीकी रामायणात उल्लेखित ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती आणि संपूर्ण भारतवर्षात सापडलेल्या पुरातात्विक अवशेषांच्या आधारावर करण्यात आला आहे. म्हणजे तारखेप्रमाणे विचार केल्यास गेल्या 10 जानेवारी 2021 रोजी प्रभू रामचंद्रांची 7135 वी जयंती होती असे म्हणावे लागेल.
मुस्लिम धर्माचा उगमच साधारण 14 शे वर्षांपूर्वी व इसाई धर्माचा उगम साधारण 16 शे वर्षांपूर्वी झाला. म्हणजेच भारतात बाहेरून आलेले ख्रिश्चन व मुस्लिम वगळता भारतातील ख्रिश्चन व मुस्लिम हे रामाचे वंशज ठरतात. वेद, रामायण, महाभारत आणि गीता सनातन धर्माचे मुख्य आधारस्तंभ असून राष्ट्र धर्माप्रमाणे आचरण करण्याचा संदेश देतात. अकबराच्या काळातील ‘राम-सीता’ असे नाणे उपलब्ध आहे. रामाचा प्रभाव जगभर तसेच दक्षिण-पूर्व देशात विशेषत्वाने दिसतो. वाल्मिकींचे मंदिर व्हिएतनाम येथे आहे. तेथील ‘चम्पा’च्या मंदिरात रामायण कोरले आहे. श्रीरामाबद्दल थायलंडमध्ये तर अपार श्रद्धा आहे. इंडोनेशियातील कलावंत बाली बेटावर समुद्रकिनारी मंदिराजवळ ‘रामलीला’ प्रदर्शित करतात. आपल्या शेजारच्या म्यानमारमध्ये तर शिल्प, चित्राचे रामायणाचे प्रदर्शन होत असते. रामायण क्लब व रामायण नाटय़गृहदेखील आहे. आपल्या ईशान्य भारताच्या मिझोरममध्येदेखील रामाचा प्रभाव आढळतो. आजचा मिझो समाज बहुतांश ख्रिश्चन झालेला आहे, परंतु परंपरा आणि जीवनशैली रामकेंद्रित आहे. अनेक आदर्शांचे प्रतीक म्हणजे प्रभु श्रीरामचंद्र. राम आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती आणि आदर्श राजा अशा सर्वच आदर्शांचे प्रतीक असला तरी ‘आदर्श राजा’ हे रामाचे वैशिष्टय़ सर्वच जातीधर्माच्या लोकांसाठी महत्त्वाचे असल्याने रामराज्य म्हणजे आदर्श राज्य असे आपण म्हणतो. श्रीराम ज्या काळात होऊन गेले त्यावेळी सनातन धर्म वगळता इतर कुठलाही धर्म अस्तित्वात नसल्याने श्रीराम सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व करतात. शिवाय ते भारतवर्षात होऊन गेले असल्याने सर्वच भारतीयांना त्यांचा व त्यांच्या आदर्शांचा अभिमान वाटायला हवा आणि म्हणूनच विविध कारणांनी जी काही कटुता निर्माण झाली होती ती विसरून सर्वांनीच अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभ्या राहणाऱया भव्य राममंदिर निर्मितीत सहभागी व्हायला हवे. राम हा आपल्या सर्वांचा स्वाभिमान तर आहेच पण सर्व भारतीयांना एकत्र गुंफणारा शक्तिशाली धागा आहे. खेडेगावात ‘राम राम’ म्हणून नमस्कार करण्याची पद्धत आहे. जन्मल्यावर नाव ठेवताना रामाचा पाळणा म्हणण्याची पद्धत आपल्याकडे आहे, तर मृत्यूनंतर ‘रामनाम सत्य है, जय श्रीराम किंवा त्याने राम म्हटला’ असे म्हणण्याची पद्धत आहे. असे रामाने आपले पूर्ण जीवन व्यापलेले आहे. देशातील एका उद्योजकाने मंदिराचा पूर्ण खर्च करण्याची तयारी दाखवली होती. पण राममंदिर निर्मिती ट्रस्टने हे नम्रपणे नाकारत या उदात्त कार्यात सर्वांना संधी मिळावी म्हणून 10 रु.पासून 100 आणि 1 हजार रु.पर्यंत राशी देणगीच्या रूपात कूपनच्या माध्यमातून संग्रहित करण्याचे ठरविले आहे. संपूर्ण मंदिरावर 1100 कोटी रु. खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे भव्य राममंदिर निर्मिती म्हणजे राष्ट्रनिर्माणाचेच काम असल्याने प्रत्येकाने ज्यांना मोठी रक्कम देणे शक्मय नाही त्यांनी किमान दहा रु.चे कूपन घेऊन जात, धर्म, पंथ आणि राजकीय विचारसरणी बाजूला ठेवून आपला सहभाग नोंदविण्याची संधी सोडता कामा नये.
अशा सर्वव्यापी असलेल्या अयोध्येतील भगवान श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण मोहिमेची सुरुवात मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुरू झाली. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी भारताचे प्रथम नागरिक आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाख रु. देऊन भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्याला शुभेच्छा दिल्या. (तथाकथित निधर्मीवाद्यांनी यावरही टीका केलीच.) आधी राममंदिर थोडे लहान बांधायचे ठरले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने 5 ऑगस्ट 2019 रोजी दिलेल्या निवाडय़ानुसार 70 एकर जागा देण्याचे घोषित केल्याने आराखडा बदलण्यात आला 3 मजल्यांपैकी प्रत्येकाची उंची 20 फूट असेल. ज्या प्लॅटफॉर्मवर मंदिर उभे राहील, तो जमिनीपासून साडे सोळा फूट उंच असेल. जमिनीपासून मंदिराची उंची 161 फूट असेल. हे मंदिर पूर्णतः दगडात बांधलेले असेल आणि सुमारे 4 लाख घनफूट दगडांचा वापर केला जाईल. सुमारे 75 लाख घनफूट कोरीव काम केलेले दगड यापूर्वीच अयोध्येच्या कार्यशाळेत तयार आहेत. तज्ञांना अलीकडे मंदिराच्या जागेवर जमिनीपासून खाली काही मीटरवर वाळू सापडली. याचाच अर्थ प्रस्तावित मंदिराच्या जवळपास शरयू नदी वाहात होती हे सिद्ध होते. तसेच जमिनीत 60 मीटर खोलीवर वाळू सापडली आहे हे लक्षात घेऊन मंदिराचा पाया असा तयार करण्यात येणार आहे, जो पुढील 1000 हून अधिक वर्षे टिकेल. मंदिराच्या उभारणीसाठी आयआयटी-दिल्ली, रुर्की येथील केंद्रीय इमारत संशोधन संस्था, एनआयटी सूरत, आयआयटी-गुवाहाटी, टीसीई, आयआयटी-मद्रास आणि आयआयटी-मुंबई या आठ संस्थांमधील सदस्यांचा समावेश असलेल्या तज्ञ समितीची स्थापना करण्यात आली आहे.
(लेखमाला समाप्त)
विलास पंढरी – 9860613872