मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची अमीट छाप सोडणाऱया ज्येष्ठ अभिनेत्या आशालता वाबगावकर यांच्या निधनाने एका मनस्वी व चतुरस्र कलाकारालाच नाटय़-चित्रजगत मुकले आहे. मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांची पाच ते सहा दशकांची कारकीर्द म्हणजे वैविध्याने नटलेला कलाविष्कारच म्हणायला हवा. नाटक, मालिका असो वा चित्रपट, कोणत्याही माध्यमाला त्यांनी कधी कमी लेखले नाही. अभिनय हाच श्वास आणि ध्यास मानणाऱया या अभिनेत्रीने कोव्हिडच्या साथीत आणि ऐन ऐंशीच्या उंबरठय़ावर असतानाही कलेशी असलेले नाते कायम राखले. साताऱयात ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त असलेल्या आशालताताईंना सेटवरच कोरोनाने ग्रासले आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला. मात्र, जाता जाताही कलेशी असलेल्या अतूट निष्ठेचेच या अभिनेत्रीने दर्शन घडविले. त्यामुळे ऐहिक जगाचा त्यांनी निरोप घेतला असला, तरी आपल्या विविधरंगी भूमिकातून, नाटय़गीतातून त्या जिवंतच राहणार आहेत. कोकणी, मराठी नाटक व चित्रपटांबरोबरच हिंदीतही यश मिळविणाऱयांमध्ये मोजक्याच कलाकारांची नावे घेता येतात. त्यात आशालता यांचे नावही अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्यांनी ही मनसोक्त मुशाफिरी केली, ती आपली बैठक पक्की असल्यामुळेच. मराठी संगीत नाटकातून त्यांनी आपला पाया भक्कम केला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाटय़स्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशय कल्लोळ’ या नाटकातून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. यातील रेवतीच्या भूमिकेने त्यांच्या कारकिर्दीला वेगळे वळण मिळाले. या नाटकासह संगीत शारदा, वसंतसेना या नाटकातील शारदा व वसंतसेना या भूमिकांसाठीही त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. किंबहुना, त्यांनी खरी ओळख मिळवून दिली, ती मत्स्यंगधेच्या भूमिकेने. प्रा. वसंत कानेटकर यांच्या या नाटकातील महाभारतामधील सत्यवती अर्थात मत्स्यगंधेच्या भूमिकेचे शिवधनुष्य आशाताईंनी आपल्या चपखल संवादफेक व दमदार अभिनयाने लीलया पेलले. त्याचबरोबर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील या कलाकृतीत आपल्या मधुर आवाजानेही त्यांनी जान ओतली. यातील सर्वच गाणी आशाताई व रामदास कामत यांनी आपल्या जादुई स्वरांनी अजरामर केली आहेत. त्यांची गोडी इतकी अवीट आहे, की आजही ती रसिकांच्या हृदयात रुंजी घालतात. ‘गुंतता हृदय हे कमलदलाच्या पाशी, हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी,’ हे नाटय़गीत जितके गुंतवणारे तितकेच ‘गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी, काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी?’ हे गीतदेखील आनंदाच्या डोहात डुंबविणारे होय. आणि ‘अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा’ हे दर्दभरे गीत. यातील आशालताताईंच्या गर्द स्वरांची मोहिनी आजही ओसरलेली नाही. हेच त्यांच्या गाण्याचे मोठेपण म्हणता येईल. ‘भावबंधन’ या नाटकातील लतिकेच्या भूमिकेकरिता त्यांनी घेतलेले अपार परिश्रमही असेच. एवढेच नव्हे, तर पूर्वसुरींच्या भूमिका करण्याचे धाडस दाखवून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविण्याची कामगिरीही त्यांनी कोणत्याही अभिनिवेशाविना पार पाडली. ‘रायगडला जेव्हा जाग येते’मधील येसूबाई, ‘गुंतता हृदय’मधील कल्याणी, ‘गारंबीचा बापू’तील राधा, ‘भाऊबंदकी’मधील आनंदीबाई या भूमिकांचा त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करता येईल. सुधा करमरकर, पद्मा चव्हाण, उषा किरण, दुर्गाबाई खोटे यांनी आधी साकारलेल्या या भूमिकांना आशाताईंनी वेगळय़ा वाटेने पण तेवढय़ाच उंचीवर नेले, हाच त्यांचा विशेष होय. घरात फुलला पारिजात, गरुडझेप, वाऱयावरची वरात, गुड बाय डॉक्टरपर्यंत कितीतरी नाटकातून त्यांनी रंगभूमी जागवत ठेवली. पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱयावरची वरात’ या नाटकातील कडवेकर मामी, तिचा कन्नड ढंग म्हणजे आपल्या संवादातील पकडीतून ‘वारा’ कसा फिरविता येतो, याचाच नमुना. मराठी नाटक समृद्ध करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱया आशाताईंनी चित्रपटसृष्टीतही मोलाचे योगदान दिले. सावित्री, पुढचं पाऊल, उंबरठा, नवरी मिळे नवऱयाला, एकापेक्षा एक अशा कितीतरी मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची नाममुद्रा उमटविली. हिंदीतही अपने पराये, जंजीर, अंकुश, नमक हलाल, सदमा, घायल, अग्नीसाक्षी अशा असंख्य चित्रपटात त्यांनी काम केले. हिंदीत प्रामुख्याने आईच्याच भूमिका त्यांच्या वाटय़ाला आल्या. त्यांच्या अभिनयातील हळवेपणा अस्सल असे. मला ग्लिसरिन लावायची गरज कधी पडली नाही, असे त्या म्हणत. हळव्या भूमिकांबरोबरच त्यांनी कठोर, कणखर, सूडाने पेटलेल्या, खाष्ट भूमिकाही तितक्याच्या नैसर्गिक अंदाजात व तन्मयतेने साकारल्या. खणखणीत आवाज हे त्यांचे बलस्थान होते. कलाकार म्हणून त्या अत्यंत प्रामाणिक व निष्ठावान होत्या. कलेशी त्यांनी कधीही प्रतारणा केली नाही. त्यामुळे कुठल्याही भूमिकेला गौण न मानता त्यांनी त्याकरिता शंभर टक्के योगदान दिले. म्हणूनच त्यांची भूमिका छोटी, मोठी कशाही प्रकारची असो, ती मनात सदैव घर करून राहात असे. मुख्य म्हणजे भूमिकांमध्ये त्यांनी कधी एकसुरीपणा येऊ दिला नाही. भल्याभल्यांना जे जमले नाही, ते त्यांनी करून दाखवले, ते त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाच्या बळावरच. ‘गर्द सभोवती’ या पुस्तकातून त्यांनी आपल्या अनेक आठवणी जागवल्या आहेत. या पुस्तकाच्या शीर्षकातून रंगभूमीशी व नाटय़गीताशी असलेली नाळ त्यांनी कधी तुटू न दिल्याचेच अधोरेखित होते. संवदेनशील, आनंदी, चैतन्यदायी व चिरतरुण आशालताताईंच्या अभिनयात, गाण्यात चाफेकळीसारखीच टवटवी, सहजसुंदरता होती. हा गोडवा, गंध रसिकांच्या हृदयात कायमच वास करीत राहील हे निश्चित आहे. आशालताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
Previous Articleदिव्याचा राक्षस
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.