प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाविरुद्धच्या (कोविड-19) लढय़ामध्ये चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने पंतप्रधान केयर्स फंड व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 1.72 कोटी जमा केले आहेत. 6 कोटी रुपये देण्यात येणार असून एकूण मिळून 21 कोटी रुपये देण्याची शपथ घेतली आहे.
1949 साली स्थापना झाल्यापासून गेली 70 वर्षे चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिटय़ूटने सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये सहकार्याची भूमिका घेत कायदेशीर पद्धतीने व सुनिश्चित वाटचाल केली. सारे जग कोविड-19 या साथजन्य रोगाशी झुंजत आहे. या रोगाशी दोन हात करण्याच्या राष्ट्राच्या प्रयत्नात शक्य ते सर्व प्रकारचे सहकार्य देणे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे असे चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिटय़ूट मानते. रत्नागिरीतही इन्स्टिटय़ूटची शाखा गेली तीन-चार वर्षे कार्यरत आहे. या शाखेमार्फतही मदतनिधी दिला जाणार आहे.
इन्स्टिटय़ूटने तिच्या जवळपास 10 लाखाच्या संख्येने असलेल्या विद्यार्थी, कर्मचारी व सदस्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे व विशेषतः सढळहस्ते देणगी देण्याचे आवाहन केले आहे. इन्स्टिटय़ूटने 6 कोटी रुपये ऐच्छिक सहभागातून जमवून देण्याचे ठरवले आहे. त्यापैकी 1.72 कोटीचा पहिला हप्ता 31 मार्च रोजी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीमध्ये जमा केला. उर्वरित 4.28 कोटी रुपये 20 एप्रिलपर्यंत पंतप्रधान केयर्स फंडामध्ये जमा केले जातील.
पंतप्रधान आणि कंपनी कामकाज मंत्रालयाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून इन्स्टिटय़ूटने 15 कोटी रुपये अधिकचे म्हणून देण्याचे ठरवले आहे. अशाप्रकारे इन्स्टिटय़ूटचा आर्थिक सहभाग एकूण 21 कोटी रुपयांचा असेल. या व्यतिरिक्त इन्स्टिटय़ूटचे विद्यार्थी, कर्मचारी व सदस्य यांनी वैयक्तिक पातळीवर आपापल्या ठिकाणी विविध प्रकारे मदत देत आहेत.
ज्या-ज्या वेळी राष्ट्रावर संकट आले, त्या त्या वेळी चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिटय़ूटने जबाबदारी समजून सढळपणे मदत करून राष्ट्रकार्याला सहभाग घेतला आहे. इन्स्टिटय़ूटला स्वतःच्या व्यावसायिक व सामाजिक जबाबदार्यांची पुरेपूर जाणीव असून, त्यालाच अनुसरून यावेळी पुन्हा एकदा सहाय्य व मदत करण्यासाठी इन्स्टिटय़ूटट उभी राहिली आहे.