प्रतिनिधी/ निपाणी
गत चार दिवसांपासून पावसाने चिकोडी उपविभागात पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. याबरोबरच पाणलोट आणि धरण क्षेत्रातही पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे वेदगंगा, दूधगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. दरम्यान गेल्या आठवडय़ात पाण्याखाली गेलेले चिकोडी उपविभागातील सर्वच बंधारे वाहतुकीस खुले झाले आहेत. दरम्यान पावसाने उसंत घेतल्याने पेरणी कामांना गती मिळाली आहे.
16 आणि 17 जून रोजी मान्सूनने दमदार सलामी दिली होती. निपाणी, चिकोडी तालुक्यातही संततधार पावसाने हजेरी लावली. तर पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला होता. यामुळे वेदगंगा, दूधगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ होताना सदर नद्यांवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले होते. यामुळे सदर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र दोन दिवस झालेल्या पावसानंतर गत चार दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी घट झाली आहे. तसेच पावसाने घट दिल्याने पेरणी कामांना पुन्हा वेग आल्याचे चित्र चिकोडी उपविभागात पहावयास मिळत आहे.
बंधारे वाहतुकीस खुले
नद्यांची पातळी घटल्याने वेदगंगा नदीवरील कुन्नूर-भोज खडकोळ बंधारा, दुधगंगा नदीवरील कारदगा-भोज, बारवाड-कुन्नूर, एकसंबा-दत्तवाड, मलिकवाड-दत्तवाड आणि कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर हे बंधारे वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे वाहतूक पूर्ववत झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मृग संपला, आर्द्राकडून अपेक्षा
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मृग नक्षत्रातील पावसाने निपाणी भागात समाधानकारक बरसात केल्याचे पहायला मिळते. 7 जून रोजी सुरू झालेल्या मृग नक्षत्रात 15 दिवसांपैकी 10 दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. या नक्षत्रात एकूण 121.4 मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, मका या पिकांसाठी पोषक स्थिती आहे.
यानंतर रविवारी रात्री सुर्याने आर्दा नक्षत्रात प्रवेश केला आहे. आतापर्यंत निपाणी भागात 85 टक्के पेरणी कामे आटोपली आहेत. गेल्या चार दिवसात पावसाची उसंत मिळाल्याने उर्वरित पेरणी कामेही आटोपली जात आहेत. असे असले तरी आर्द्रा नक्षत्रात पाऊस होणे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहे. त्यामुळे विश्रांती घेतलेला वरुणराजा पुन्हा कधी बरसात करेल, याकडे शेतकऱयांचे डोळे लागले आहेत.