चिपळूण
मुंबईकडे भरधाव जाणाऱया कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात दोघेजण गंभीररित्या जखमी झाले. मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ-डिगेवाडी परिसरात रविवारी सायंकाळी हा अपघात झाला.
अपघातात सुदेशिनी सुरेश सकपाळ (40, भिले-बौध्दवाडी) व विनोद विजय चव्हाण (भोम-वरचीवाडी) यांचा मृत्यू झाला. तर सुरेश आंबे व जयंत विजय दळवी (47, अंधेरी-मुंबई) हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश आंब्रे, त्याचा मित्र विनोद चव्हाण तसेच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱया सुदेशिनी सकपाळ असे तिघे दुचाकीवरून चालले होते. सकपाळ यांना सावर्डे येथे सोडण्यासाठी ते ट्रिपल सीट निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ-डिगेवाडी परिसरात रविवारी सायंकाळी ओव्हरटेक करत भरधाव मुंबईकडे जाणाऱया शेवरोलेट एंजॉय कारने या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात सुदेशिनी सकपाळ जागीच ठार झाल्या, तर दुचाकी चालक विनोद चव्हाण, सुरेश आंब्रे व कारमधील जयंत विजय दळवी हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तत्काळ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विनोद चव्हाण याचा सोमवारी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक झगडे, हेडकॉन्स्टेबल उदय भोसले, विनोद आंबेरकर आदी घटनास्थळी पोहचले. याप्रकरणी सुरेश सुधाकर आंब्रे (27, वैजी-उगवतवाडी) यांनी चिपळूण पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालक संकेत सुनील सुखदरे (29, कोळीवाडा-वरळी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद आंबेरकर करत आहेत.