रत्नागिरी जिल्हय़ात पावसाची दाणादाण : चिपळुणात 6 तर रत्नागिरीत एकाचा बळी
प्रतिनिधी / चिपळूण
बुधवारी रात्रीपासून ढगफुटी झाल्याप्रमाणे पाऊस कोसळल्याने जिल्हय़ात पूरस्थिती निर्माण झाली. त्यातच कोळकेवाडी धरणाचे चार दरवाजे उघडल्याने चिपळूण शहरासह खेर्डी परिसराला महापुराने वेढा घातला. जिल्हय़ात महापुरामुळे चिपळूणमध्ये सहा तर रत्नागिरी एकाचा बळी गेला आहे. 26 जुलै 2005 ला आलेल्या महापुरापेक्षा हा महाप्रलय असल्याने शहर परिसरातील हजारो नागरिक घराच्या माळे, छपरावर अडकून पडले. या लोकांना बाहेर काढण्यासाठी गुहागरसह अन्य तालुक्यातील मच्छीमार आपल्या बोटी घेऊन येथे दाखल झाले आहेत. शहर परिसर पूर्णतः पाण्याखाली गेला असून अडकलेले मदतीसाठी आक्रोश करीत होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत एनडीआरएफ, कोस्टगार्ड, नौदलाची टीम घटनास्थळी पोहोचली नव्हती. मुंबई-गोवा, गुहागर-विजापूर आदी महामार्ग ठप्प झाले आहेत.पेढे येथे दरड कोसळून तिघाजणांचा तर एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शहरातील दोघा महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
तर रनागिरीत टेंभ्ये बौध्दवाडी महिला पाण्यात वाहून गेल्याची दुर्घटना घडली आहे.तब्बल चिपळूण आणि खेर्डी येथील सुमारे 60 हजारहून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून चिपळूण तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. मात्र त्यामध्ये गेल्या दोन दिवसांत अधिक वाढ झाली आहे. यातच बुधवारी दिवसभर आणि रात्री तर अक्षरशः ढगफुटी झाल्यागत पाऊस कोसळला. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 202 मिलिमीटर तर यावर्षी आतापर्यंत 2 हजार 95 मी. मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी 22 जुलैपर्यंत 1 हजार 123 मी.मी. इतकाच पाऊस झाला होता. गुरुवारी झालेला या वर्षांतील विक्रमी आहे.
चिपळुणात 2 महिला मृत
पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. एक महिला पाण्यात बुडाली असून दुसरी वाहून गेल्याची माहिती आहे. एकविरा मंदिर परिसरात राहणाया एका कुटुंबाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढताना एका वयोवृद्ध महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. संबंधित माहिला सदनिकेत एकटी राहत होती. पाणी वाढत असताना तिला अंदाज आला नाही. सदनिकेत पाणी वाढल्यानंतर जीव वाचवण्यासाठी ती घराबाहेर पडली, तेव्हा पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. संबंधित महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. बेंदरकर आळी येथील एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तसेच गोठय़ात बांधलेली अनेक गुरे जागेवरच मृत्यूमुखी पडली. तर अनेक गुरे पुरामध्ये वाहून गेली. अनेक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत आपली गुरे दावे सोडवून वाचवली.
डेपो मॅनेजरसह चौघांना जीवदान
महापुरात अडकलेले डेपो मॅनेजर रणजित राजेशिर्के हे पुराचे पाणी वाढू लागताच तत्काळ एसटी बसच्या टपावर चढले. यावेळी त्यांच्यासोबत 3 कर्मचारी होते. त्यांनी मदतीसाठी पोलिसांना संपर्क साधला. शायंकाळी या सर्वांना बोटीतून बाहेर काढून जीवदान दिले.
आपत्कालीन मदतीचे साहित्य पाण्यात
पुराचा सामना करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा पावसाळ्य़ापूर्वी सज्ज होती. तीन बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड बोये आणि इतर सामग्रीचा आपत्कालीन यंत्रणेत समावेश होता. हे साहित्य इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसरातील अग्निशमन केंद्रात ठेवण्यात आली होती. अग्निशमन केंद्र पाण्याखाली गेल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणाही पुराच्या पाण्यात अडकली आहे. पालिकेच्या अधिकाऱयांचे फोन लागत नाहीत. पालिका परिसरही पाण्यात गेला आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी चिपळूण पोलीस ठाण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यातून शक्य होईल, तेवढे मदतकार्य सुरू आहे. मुरादपूर, पेठमाप, मजरेकाशी, शंकरवाडी, देसाई मोहल्ला, महाराष्ट्र हायस्कूल परिसर, दादरकर मोहल्ला येथील बैठय़ा घरांच्या छतापर्यंत पाणी गेले आहे. अनेक कुटुंबे अपार्टमेंटच्या छतावर जीव वाचवण्यासाठी गेली आहेत.
कोविड केंद्रातील 21 रुग्णांचा जीव धोक्यात
चिपळूण पालिका व अपरांत रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने खेडेकर क्रीडासंकुल येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यात 21 रुग्ण आहेत. येथील ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव धोक्यात आहेत. सेंटरच्या बाहेर उभी असलेली रुग्णवाहिका वाहून गेली आहे. कोविड सेंटरच्या चारही बाजूने पाणी असल्यामुळे आतमध्ये प्रवेश करणे शक्य नाही. त्यामुळे रुग्णांना दुपारचे जेवण किंवा इतर मदतकार्य करण्यास अडथळे येत आहेत.
पहाटेच पुराचा वेढा
बुधवारी रात्री 3 पासून वाशिष्टी शिवनदीचे पाणी शहरात घुसू लागले. मात्र सारे झोपेत असल्याने आणि एवढय़ा पुराची अपेक्षा नसल्याने भरलेल्या पाण्याचे कुणी फारसे मनावर घेतले नाही. सकाळी उजडल्यानंतर महापुराच्या पाण्याचा वेढा पडलेला पाहून सर्वांचीच पाचावर धारण बसली. रात्रीत पुराचा वेढा पडल्याने घरातील, बिल्डिंगमधील कोणाही नागरिकांना बाहेर पडता न आल्याने जागच्या जागी सारे अडकून पडले
बाजारपेठेत 15 फूट पाणी
शहरातील वाशिष्टी व शिवनदी लागतचचा परिसर पाण्याखाली गेल्यानंतर मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली. बाजारपेठेत 15 फुटाहून अधिक पाणी होते. त्याचबरोबर भोगाळे रस्ता पाण्याखाली गेल्यानंतर एसटी बसस्थानकातही पाणी घुसले आणि 11 वाजेपर्यंत बसस्थानकातील उभ्या असलेल्या बसही पाण्याखाली बुडाल्या. मार्कंडी, शिवाजी चौक येथे तर दुकानांच्या छप्परला पाणी लागले होते.
खेर्डीमध्येही हाहाकार
खेर्डीमध्येही 6 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले असून अख्खी बाजारपेठ पाण्याखाली आहे. याशिवाय शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. 2005 नंतर प्रथमच चिपळूण-कराड रस्त्यावर खेर्डी येथे प्रथमच पाणी आले होते. बहादूरशेख नाका ते खेर्डी रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते.
महामार्गासह अंतर्गत रस्ते बंद
बहादूरशेख नाका, उक्ताड बायपास, मिरजोळी आदी रस्त्यावर पाणी असल्याने मुंबई-गोवा महामार्ग, कराड रोड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तर वाशिष्ठी नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर ब्रिटिशकालीन बहादूरशेख पूल वाहतुकीसाठी रात्री 11.15 वाजल्यापासून बंद करण्यात आला. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल व नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.
रात्रभर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाटमाथ्यापासून मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्ठी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा होता. शहरातील जुना बाजार पूल, बाजारपेठ, जुने बसस्टॅन्ड, चिंचनाका मार्कंडी, बेंदरकर आळी, मुरादपूर रोड, एसटीस्टँड, भोगाळे, परशुराम नगर याबरोबरच खेंड परिसरात पाणी वाढले होते. रॉयलनगर तसेच राधाकृष्ण नगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते
मदतीसाठी चिपळूणवासीयांचा टाहो
चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडत असून 2005 सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 5 हजाराहून अधिक नागिरक पुरात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक मदतीसाठी याचना करत असून यातून त्यांची सुटका करण्याचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे. अचानक पाण्यात वाढ झाली व संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. ठिकठिकाणी नागरिक कुणी घरात, कुणी माळ्यावर, कुणी टेरेसवर अडकून पडल्याने मदतीचा आक्रोश दिवसभर सुरू होता.
बाजारपेठेतील दुकाने पाण्याखाली
2005 पेक्षाही भयाण परिस्थिती यावेळी आहे. बाजारपेठेतील दुकानेच्या दुकाने पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पहाटेची वेळ असल्याने काहीच साहित्यही वाचवता आलेली नाही. या महापुरात बाजरपेठ पूर्णतः उध्वस्त झाली आहे. अगोदरच कोरोनामुळे व्यापार मंदावलेल्या असतानाही या नव्या संकटाने व्यापारी हतबल झाला आहे. सध्या बुडालेली दुकाने पाहत राहण्यावाचून त्याच्याकडे काहीच उरलेले नाही.
शेकडो वाहने पाण्याखाली, असंख्य वाहून गेली
या महापुरात नागरिकांचे बाहेर पडता आलेले नसल्याने बिल्डिंगखाली, रस्त्यात, गल्लीबोळात उभ्या असलेल्या गाडय़ा पाण्याखाली गेल्या आहेत. कित्येक वाहने वाहून गेली आहेत. काही पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहत जाऊन मध्येच उलटय़ा होऊन अडकलेल्या आहेत.
‘न भूतो, न भविष्यती’ नुकसान
पहाटेपासूनच्या महापुरामुळे अनेक ठिकाणी पडझड झाल्याची नोंद आहे. घरे कोसळली आहेत. रस्ते उखडले आहेत. तर काही रस्ते खचल्याने मार्ग बंद झाले आहेत. बाजारपेठ उद्ध्वस्त, घरेदारे पाण्याखाली, वाहने बुडाली. त्यामुळे चिपळूणचे ‘न भूतो न भविष्यती’ नुकसान झाल्याचे दिसत आहे.
आमदार निकम सकाळपासून ठाण मांडून
आमदार शेखर निकम तर सकाळी 6 वाजल्यापासून चिपळुणात ठाण मांडून प्रशासकीय यंत्रणेला सूचना करत होते. पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी, तसेच अन्य तालुक्यातील मच्छीमार व बोटी त्यांनी मागवल्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांच्याशी संपर्क साधत मदतीबाबत संपर्कात होते.
26 नागरिकांना नगर परिषद टीमने पाण्याबाहेर काढले
चिपळूण शहरातील परशुराम नगर भागातील 26 नागरिकांना नगर परिषद टीमने पाण्याबाहेर काढले. 9 फूट पाणी घरात शिरल्याने नागरिक भयभीत झाले होते. हे नागरिक कौलारू घरात राहत होते. या कामी नगरसेवक शशिकांत मोदी, आरोग्य विभागप्रमुख महेश जाधव, नाईक, अनिल आंब्रे, शिवेंद्र सुर्वे, अभिजित आंब्रे, वाहनचालक गांधी यांनी सहकार्य केले. परशुरामनगर भागात मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्याने नागरिक अडचणीत आले आहेत.
नेत्रावती आज पाच् तास विलंबाने धावणार
कोकण मार्गावरील रेल्वेगाडय़ांचे विस्कळीत झालेले वेळापत्रक आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या मार्गावरून धावणारी नेत्रावती एक्सप्रेस 23 जुलै रोजी 5 तास विलंबाने धावणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसहून ही गाडी सकाळी 11.40 ऐवजी सायंकाळी 4.40 वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेसही 3 तास उशिराने धावणार आहे. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दुपारी 3.20 वा. सुटण्याऐवजी सायंकाळी 6.30 वा. सुटेल. या पाठोपाठ मडगाव-सीएसएमटी कोकण कन्या एक्सप्रेसही 1 तास उशिराने सुटेल. मडगाव येथून सायंकाळी 4.45 वा. सुटण्याऐवजी 5.45 वा. सुटेल.
पुढील चौकट पान 1 लाच घेणे—
कोळकेवाडीचे 4 दरवाजे उघडल्याने महाप्रलय
कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने गुरूवारी पहाटे या धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर चिपळूण तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीनंतर समोर आली. दरवाजे उघडणे आवश्यक होते. त्यामुळे पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
सिंधुदुर्गसह ठिकठिकाणाहून बोटी दाखल
चिपळुणातील महापुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी गुहागर तालुक्यातून मच्छीमार आपल्या बोटी ट्रकमधून देऊन चिपळुणात दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर मालवण येथूनही बोटी आल्या आहेत. बचावकार्य सुरू झाले आहे.
पुढील चौकट पान 1 लाच घेणे—
फोटो–22 कलर 7 नावाने
आंबा घाटात रस्ता खचला
रत्नागिरी-कोल्हापूर हायवेवर आंबा घाटात सकाळी कोल्हापूरकडे जाणारा रस्ता खचला आहे. यामुळे वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली आहे. आंबा घाट व साखरपा पोलीस स्थानक या दोन ठिकाणी बॅरीकेटस् टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली दरड कोसळण्याची मालिका सुरूच आहे. त्याच ठिकाणी पुन्हा दरड व मोठे दगड खाली येत आहेत. यामुळे या रस्त्यावर वाहतूक करणाऱयांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलीस कर्मचाऱयांनी केले आहे. यावेळी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक संजय उकार्डे, रोहित यादव, वैभव नटे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पुढील चौकट पान 1 लाच घेणे—
टेंभ्येत महिला पऱयाच्या पाण्यात वाहली
रत्नागिरी शहरालगत असलेल्या टेंभ्ये बौध्दवाडी येथील महिला आशा प्रदीप पवार (55) या आडकरवाडी येथील पावाचा खाजण पऱयातून जात होत्या. त्यांचा तोल जावून त्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी 7 वा. घडली. पवार या कोविड लसीचा डोस घेण्यासाठी चांदेराई प्राथमिक आरोग्य केंद्रात जात होत्या. सकाळी त्या तेथे जाण्यासाठी निघाल्या असता आडकरवाडीतील पावाचा पऱयाला पुराचे पाणी आल्याने तो तुडुंब वहात होता. तो पऱया पार करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पुराच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
26 जुलैपर्यंत अतिमुसळधार
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबईकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 22 ते 26 जुलै या कालावधीत जिल्हय़ात काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रवीण दरेकर आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जिल्हा दौऱयावर येत आहेत. शुक्रवार 23 जुलै रोजी सकाळी 8 वाजता चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह चिपळूण येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता चिपळूण जि. रत्नागिरी येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे ते प्रयाण करणार आहेत.
चौकट
नदी धोका पातळी सध्याची पातळी
खेड- जगबुडी नदी 5 8
वाशिष्ठी, चिपळूण 7 6
काजळी 18 19.74
कोदवली राजापूर 8.13 8.20
शास्त्राr संगमेश्वर 7.8 8.90
सोनवी संगमेश्वर 8.6 8.70
मुचकुंदी लांजा 4.5 4.50
बावनदी 11 12.90