मोजक्याच पालकांनी दर्शवली तयारी : संमत्तीपत्र असले तरच विद्यार्थ्यांस एन्ट्री : शाळांची शाळा सुरुची तयारी पूर्णत्वास
चिपळूण: कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरु होत असल्याने या संदर्भात शाळा व पालकांची बैठक घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे मोजक्याच पालकांनी पाल्यास शाळेत जाण्याची संमत्ती दिल्याने पहिल्या दिवशी किती विद्यार्थी शाळेत येतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर अद्याप संभ्रम आहे. मात्र शाळांनी आपल्या शाळा सुरु करण्याची तयारी पूर्णत्वास नेली आहे.
कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद झाल्यानंतर त्या सुरु करण्याबाबत शासन स्तरावरुन सातत्याने विचारविनीमय सुरु होता. असे असताना इतक्या महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु केले जाणार असल्याने या आदेशानंतर शाळांनी आपली शाळा सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. विशेष म्हणजे सोमवारपासून शाळा सुरु होत असल्या तरी शाळेत आपल्या पाल्यास पाठवण्याची मानसिकता पालकांची दिसून येत नसल्याने शाळा सुरु करण्याबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. 40 टक्के पालकांनीच नाहरकत घेतली असून उर्वरित पालकांनी मात्र शाळा सुरु करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र सोमवारपासून सुरु होणाऱया शाळेसाठी शाळांनी आपली तयारी सुरु केली असून शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांचे तपमान, तसेच सॅनिटायझरची सुविधा करण्यात आली आहे. तसेच आवश्यक नियमावलीचे सूचना फलकही शाळेत लिहिण्यात आले आहेत. काही शाळांनी पालकाचे संमत्तीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून तशा सूचनाही शिक्षकांनी पालकांना दिल्या आहेत.
शाळा सुरुचा निर्णय पालकांवर अवलंबून
सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी पालकांनी अद्याप म्हणावी तशी संमत्ती दर्शवली नाही. शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेत सॅनिटायझर, तापमान मोजणे, मास्क आदींची अंमलबजावणी केली आहे. तसा निर्णयही घेतला आहे. शाळा सुरुसाठीची पालकांची भूमिका महत्वाची आहे.