नदीतील गाळ काढण्यासाठी कोकणातील चिपळूण शहरात शेकडो नागरिक गेल्या आठवडाभरापासून बेमुदत साखळी उपोषणाला बसले आहेत. यामध्ये पूरमुक्त चिपळूणसाठीचा सुरू असलेला आक्रोश, त्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांकडून सोडण्यात येत असलेले टीकास्त्र यामुळे वातावरण ढवळून निघत आहे. त्यामध्येच आता विरोधी पक्ष भाजपाही उडी घेण्याची चिन्हे दिसत असल्याने महाविकास आघाडी नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रश्नावर निर्णय अपेक्षित आहे. तसे झाले ठिकच ; नाही तर हे आंदोलन अधिक चिघळणार असून त्याचे लोण कोकणात पसरण्याची चिन्हे आहेत.
कोकणातील चिपळूण, खेड, महाड, संगमेश्वर, राजापूर आदी शहरे 22 जुलैच्या प्रलयंकारी महापुरात बुडाली, बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या, अनेकांचे संसार पुरते उद्ध्वस्त झाले. यामध्ये एकटय़ा चिपळूणचे सुमारे दीड हजाराहून अधिक कोटी रूपयांचे नुकसान झाले. जुलै 2005 मध्ये आलेल्या महापुरापेक्षा यावेळची तीव्रता अधिक होती. महाडलाही नुकसानीची झळ मोठी बसली. महापुरानंतर मदत आणि उपाययोजनांच्या हव्या तशा घोषणा केल्या गेल्या. मात्र आज चार महिन्यांनंतरही त्यावर फारशी कोणतीच कार्यवाही झाली नाही. पावसाळय़ानंतरचे चार महिने तर निघून गेले. महापुराला कारणीभूत ठरलेल्या वाशिष्ठीसह उपनद्यांचा गाळ काढण्यासाठी राज्य सरकारने कोणतीच पावले उचलली नाहीत. किंबहूना उपाययोजना करत असलेलेही कुठे दिसले नाहीत. त्यातच भरीस भर म्हणून जलसंपदा विभागाने निळय़ा, लाल पूररेषा आखून उद्ध्वस्त चिपळूण शहराला आणखी तडाखा दिला.
आठवडाभरापासून वातावरण तापतेय
महापुरानंतर उपाययोजनांच्यादृष्टीने झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणून नागरिकानी पूरमुक्त चिपळूणचा नारा देत बेमुदत साखळी उपोषणाचा निर्णय घेतला. तत्पूर्वी शासनाला तसे कळवलेही. मात्र कुणीच दखल न घेतल्याने अखेर गेल्या नऊ दिवसांपासून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रांत कार्यालयासमोर दररोज शेकडो नागरिक उपोषणस्थळी ठिय्या मांडून बसत आहेत. पहिल्या दिवसांपासूनच उपोषणाला विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत आणि कामगारांपासून मालकांपर्यंत प्रत्येकजण चिपळूण नगरीला पुरातून बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या लढय़ात सहभागी झाले आहेत. यातून होणारे कीर्तन, निघणाऱया रॅली, जनजागृतीपर गाणी यातून वातावरण अधिकाअधिक तापते आहे.
विरोधकांचे सरकारवर आसूड
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात चिपळुणवासियांमध्ये जनक्षोभ निर्माण झालेला असतानाच त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राज्य सरकारचे वाभाडे काढत अधिक फोडणी दिली. आलमट्टी धरणाच्या उंचीचा आणि चिपळूणच्या पुराचा संबंध असून भविष्यातही त्याचे परिणाम चिपळूणकरांना भोगावे लागणार असल्याचे सांगत सांगली, सातारा व कोल्हापूरला वाचवण्यासाठी चिपळूणचा बळी दिला गेला असा आरोप महापुरानंतर जे चिपळूणवासीय करत होते त्यालाही शेट्टी यांच्या विधानाने बळकटी मिळाली. पाठोपाठ भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनीही उपोषणस्थळी येत राज्य सरकारवर आसूड ओढले.
महाविकास आघाडी नेत्यांची धावपळ
एकीकडे चिपळूणवासियांचा आक्रोश, तर दुसरीकडे विरोधक सोडत असलेले टीकास्त्र लक्षात घेऊन तब्बल आठवडाभराने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे उपोषणस्थळी आले. शिवसेनेचा एकही मोठा नेता या आंदोलनाकडे फिरकलेला नसल्याचे पाहून सामंत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत गाळाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. लगेचच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, बंदरे विकास मंत्री असलम शेख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री अनिल परब यांनी चिपळूण बचाव समितीबरोबर बैठक घेत बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
गाळ काढण्यासाठी हवेत 160 कोटी
जलसंपदा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या अहवालानुसार चिपळुणातील संपूर्ण गाळ उपसण्यासाठी आणि नदीचे मुख मोकळे करण्यासाठी 160 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी 134 हेक्टर जमीन आवश्यक आहे. वाशिष्ठी नदीच्या उगमापासून ते चिपळूण शहरापर्यंत एकूण 27 बेटे असून ती सर्व हटवण्याचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासाठी एकूण 160 कोटी निधीची गरज आहे. आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून साडेनऊ कोटीचा निधी मिळवला आहे. उर्वरीत निधी मिळवण्यासाठी उपोषण सुरू आहे.
कोकणातील नेत्यांकडे विकासाच्या दृष्टीचा अभाव
वास्तविक कोकणातील नद्या, खाडय़ा या एकेकाळचे वैभव होते. मात्र आज चिपळूणच नव्हे तर कोकणातील बहुतांशी नद्या, खाडय़ा या गाळाने भरल्या आहेत. यातील गाळ उपसा केला तर पूर्वीचे वैभव पुन्हा उभे राहील आणि विकासालाही गती मिळेल. कारण कोकणातील विकासाची उंची समुद्राच्या खोलीत लपली आहे. ती खोली गाठल्याशिवाय यश नाही. मात्र त्यासाठी कोकणच्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी.
संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही!
फयान, निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळ अशा अनेक नैसर्गिक आपत्ती कोकणावर आल्या. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी महापुराने तडाखा दिला. मात्र प्रचंड नुकसान सोसूनही कोकणी माणूस हा प्रत्येकवेळी मिळालेल्या शासकीय मदतीवरच समाधानी राहिला. सर्रासपणे कोकणचा माणूस कोणाकडे मदत मागत नाही किंवा मदतीची प्रतीक्षा करत बसत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हेच त्याला माहिती आहे. मात्र महापुरात जीव गुदमरल्यानेच चिपळूणवासीय जागे होऊन नव्या लढय़ाला सामोरे गेले आहेत. त्यांनी दाखवलेली एकजूट वाखाणण्याजोगी आहे. यातून उद्या त्यांचा लढा यशस्वी होईल. गाळाचा प्रश्नही सुटेल. मात्र चिपळूणच्या पावलावर पाऊल ठेऊन उद्या कोकणातील अन्य शहरांनीही राजकारणविरहीत लढा देत आपापल्या प्रश्नांसाठी चिपळूणचा कित्ता गिरवला तर निश्चितच त्यामध्ये ते यशस्वी होतील यात शंकाच नाही.
राजेंद्र शिंदे