फिंगर 4 वरून सैन्य मागे घेण्याची होती अट
वृत्तसंस्था/ लंडन
भारत आणि चीनदरम्यान अद्याप तणाव कायम आहे. चीन सातत्याने चिथावणीखोर कारवाया करत असून भारतही त्याला ठोस प्रत्युत्तर देत आहे. दोन्ही देशांदरम्यान अनेक टप्प्यांमध्ये सैन्य तसेच राजनयिक स्तरावर चर्चा झाल्या असला तरीही अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. भारताने फिंगर-4 वरून माघारी परतावे, त्यानंतरच आम्ही मागे फिरू अशी अट चीनने आता ठेवली आहे.
चीन फिंगर 4 वरून फिंगर 8 वर जाईल (भारताची हीच मागणी आहे.) परंतु भारताने फिंगर 1 च्याही मागे जावे अशी चीनची मागणी आहे. परंतु भारत यापूर्वी फिंगर 8 पर्यंत गस्त घालत आला आहे. चीनची अट मान्य केल्यास भारत फिंगर 1 पर्यंतच मर्यादित राहणार आहे परंतु भारताने चीनची ही अट धुडकावून लावत त्याचा डाव हाणून पाडला आहे.
चिनी सैन्य सध्या पँगोंग त्सो सरोवरानजीक फिंगर 4 नजीक असून त्यांनी फिंगर 5 वरून फिंगर 8 पर्यंत 5 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर मोठय़ा संख्येत सैनिक आणि उपकरणे तैनात केली आहेत. चिनी सैन्याला फिंगर क्षेत्रातून पूर्णपणे स्वतःच्या मूळ स्थानी परत जावे असे भारताने बजावले आहे.