लष्करी कमांडर पातळीवर चर्चा : मोल्डो येथे बैठकीचे आयोजन
लडाख / वृत्तसंस्था
गलवान खोऱयात आठवडाभरापूर्वी उडालेल्या संघर्षानंतर वाढलेला तणाव शांत करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान चर्चेच्या फेऱया सुरूच आहेत. आता चीनच्या भूमीत वाटाघाटी सुरू झाल्या असून भारतीय लष्करानेच यासंबंधी माहिती दिली आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी कमांडर पातळीवर ही चर्चा केली जात असल्याचे सांगण्यात आले.
भारत आणि चीनमध्ये आता कमांडर पातळीवर चर्चा केली जात आहे. ही बैठक प्रत्यक्ष ताबारेषेच्या पलीकडे चीनच्या भूमीत मोल्डो येथे होत आहे. त्यात लडाखमधील तोडग्याबाबत चर्चा केली जात आहे, असे लष्करी सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही.
भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. मागच्या सोमवारी गलवान खोऱयात झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर चीनची मुजोरी समोर आली होती. या संघर्षात चीनचीही मोठी जीवितहानी झाली होती. तसेच भारताने चीनसोबतच्या संपूर्ण सीमारेषेवर अतिरिक्त सैन्य पाठवत सुरक्षा अधिक कडक केली होती. लष्कराबरोबरच वायू आणि नौदलाकडूनही सज्जतेची तयारी सुरू आहे. नुकतीच संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या संरक्षण प्रमुखांच्या बैठकीत परिस्थिती चिघळल्यास वेळप्रसंगी सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता सर्वच सेनादलांनी व्यापक सुसज्जता मोहीम हाती घेतली आहे.